शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या.


संत जनाबाई

जन्म

अंदाजे इ.स. १२५८

गंगाखेड

मृत्यू

अंदाजे इ.स. १३५०

राष्ट्रीयत्व

भारतीय

नागरिकत्व

भारतीय

वडील

दमा

आई

करुंड

जीवन

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.


बालपण

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.


आयुष्य

संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.


‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]


संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.


संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारीपद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)


जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट

ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)

संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स)

संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन)

संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)

संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)

संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)

संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)

संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)

संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])

संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])


संत वाटीकीतील 'जाईची वेल' असे वर्णन संत जनाबाईचे केले जाते. त्या स्वतःला 'नामयाची दासी जनी' म्हणून घेत असत. त्यांचा जन्म अंदाजे इसवी सन १२५८ असा सांगितला जातो.  दमा- कुरुंड या दाम्पत्याच्या पोटी झाला.  मृत्यू अंदाजे १३५० मानला जातो. त्यांचा जन्म मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचा. वयाच्या सहाव्या वर्षी जनी अनाथ झाली. त्यांच्या संदर्भात काही दंतकथा ही प्रसिद्ध आहेत. वारीला पंढरपूरला दमा आणि कुरुंद दापत्य गेले; तेव्हा दमा आणि दामा नावातील सारखेपणामुळे एका व्यक्तीने हरवलेल्या या जनाबाईला दामाशेटी या शिंप्याकडे नेऊन सोडले आणि त्यांच्याच घरी ती वाढली. जनीच्या आई-वडिलांनी म्हणजे दमा आणि कुरुंड यांनी दामाशेट्टी यांच्याकडे कामासाठी जनाबाईला पाठवले  अशीही दंतकथा सांगितली जाते. नामदेवांना जनाबाईंनी कडेवर खेळवण्याची उल्लेख त्यांच्या अभंगांमध्ये आहे. जनी म्हणजे स्त्रियांचा समूह होय. 'जनी' ही लाख स्त्रिया आहेत याचे व्यक्तिमत्व यांच्यात आहे. संत जनाबाई वर अनेक जात्यावरील ओव्या लिहिल्या. कोकणापासून दख्खन पर्यंत सर्व ठिकाणी त्यांच्यावर जात्यावरील ओव्या लिहिल्या गेल्या.  महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांचे प्रतीक म्हणजे '' असेही म्हटले जाते. सर्व संतांचे नाव प्रतीकात्मक आहे. जनी नाव हे प्रतिकात्मक आहे. तीचे चरित्र हे ओव्या मधून चित्रित झालेले आहे. अप्रतिम असे हे व्यक्तिमत्त्व होते. संत जनाबाईचा विठ्ठल हा देव नसून एक माणूस आहे. संत जनाबाईंना विठ्ठल सर्व कामात मदत करतो. त्या स्वतः विठ्ठलाला चोर ठरवितात. विठ्ठलाला शिव्याही घालतात. इतकं अतूट प्रेम त्यांचे विठ्ठलावर आहे. त्यातून त्यांचा प्रेम कलहच व्यक्त होतो. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर- ज्ञानदेव. आणि ज्ञानदेवांचे शिष्य निवृत्तीनाथ अशी गुरुपरंपरा आपल्याला सांगता येते. रुक्मिणी म्हणती 

विठ्ठल मवा कुठे गेला दासी जनीने गोविला

 शेणापाण्याला लाविला

 जनीने त्याला बांधून शेण्यापाण्याला लावले असे म्हणते. असे चमत्कारिक वर्णन अभंगात केलेले आहे. संत जनाबाई ग्रंथ प्रामाण्यापेक्षा अनुभवावर अभंग लिहित म्हणून त्या सर्वांच्या आवडत्या झाल्या. धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर 

झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी पाटी घेऊन या सिरी नेऊन या टाकी दूरी ऐसा भक्तास भुलला नीच कामे करू लागला 

जनी म्हणे विठोबाला काय उत्तर आहे हो तुला संत जनाबाई विठ्ठल भक्ती त्या इतक्या तल्लीन होऊन जात असत की प्रपंच किंवा प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना कामात सहाय्यक करीत असे. संत नामदेव हे विठ्ठल भक्त असल्यामुळे जनाबाईनाही विठ्ठलाच्या भक्ती विषयीची गोडी निर्माण झाली. त्यांना संत संग हा नामदेवामुळे लाभला.  

  आज त्यांच्या नावावर जवळपास ३५० अभंग सकलसंतगाथा या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. त्याचबरोबर त्यांचे बालक्रीडा, प्रल्हाद चरित्र, कृष्णजन्म, थाळीपाक या विषयावर जनाबाईचे अभंग आहेत.  तसेच हरिश्चंद्राख्यान रचना सुद्धा जनाबाईंनी लिहिल्या. मनाची कोमलता, उत्कट विठ्ठलभक्ती, परमेश्वर प्राप्तीची अर्थता व तळमळ वात्सल हे त्यांच्या अभंगामधून पुत्र पाहायला मिळते पंढरपूर या तीर्थस्थळी विठ्ठलाच्या महाद्वारी जनाबाई सन १३५० रोजी आषाढ कृष्ण त्रयोदशीला समाधीस्थ झाल्या. अतिशय अवघड अभंग अक्षरांचा अंकांचा खेळ ही कोडे असा अभंग आज आपण पाहणार आहोत.

 बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुराया पाशी या अभंगात संत जनाबाई अद्वेताचा सिद्धांत मांडतात. सगळ्या विश्वाच्या पलीकडची निर्गुणाची अवस्था कशी आहे. सर्व विश्वामध्ये एक तत्त्व आहे हे तत्व म्हणजेच निर्गुणाचाच सगुण आकार होय हा असे या अभंगातून अधोरेखित जनाबाई करते. संत जनाबाई लिहिणे शिकल्या की नाही माहित नाही पण हा अभंग वाचल्यानंतर समजते संत जनाबाई फक्त लिहिणे शिकल्या नाहीत तर चार वेद सहा शास्त्र अठरा पुराने सर्व कोळून त्या पिल्यात; हे लक्षात येते. इतका आघात पंडित्य दाखवणारा हा अभंग आहे. यामध्ये सर्व वेदांचे शास्त्रांचे, पुराणांचे संदर्भ आलेले आहेत. संत जनाबाई यांचे परमार्थिक गुरू संत नामदेव आहेत. या सद्गुरुरायापाशीच संत जनाबाई लिहिणे शिकले आहेत. त्या असे म्हणतात, "संत नामदेवामुळे माझा उद्धार झाला. मला साक्षात्कार झाला. मला ईश्वर भेटला '; पण ईश्वर प्राप्तीसाठी मी काय काय केले कसे कसे पुढे गेले तो साक्षात्कार या अभंगातून त्या सांगतात.


बाई मी लिहिले शिकले सद्गुरुरायापाशी ब्रह्मी झाला जो उल्लेख तोची नादाकार देख

 पुढे ओंकाराची रेख दुरिया म्हणावे तिसरी त्या म्हणतात माझ्या आतून जो ब्रह्मी असलेला आत्मोदगार झाला त्यानेच नादाकार घेतला. पुढे ओंकाराची रेख घेतली. पुढे ओम होता आणि तुरिया म्हणजे शेवटची अवस्था प्राप्त झाली. म्हणजे ईश्वर प्राप्तीची सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली परमेश्वराचे निर्गुण निराकार रूप आहे तो आपल्याला सगुन रूपात भेटला असे त्या म्हणतात मायामतत्त्वाचे सुबह तीन पाचांचा प्रकार पुढे २५ चा भारत गणती केली छातीशी माया फार अवघड आहे ती महत्त्वाचा सुभर आहे तीन पाचाचा प्रकार म्हणजे तीन दोष रज- तम-सत्व पुढे पाचाचा प्रकार म्हणजे पंचमहाभूत यात अग्नी, जल ,वायू, पृथ्वी आणि आकाश २५ काय आहे सृष्टीची ते तत्व आहेत, जी की मूळ पृथ्वीपासूनची सुरुवात झाली ते शिवापर्यंतचे ३६ टप्पे आहेत. देवाचा महिमा अगाध आहे. देव सर्वत्र आहे तो कोणत्याही रूपात कोठेही भेटतो तो निर्गुणाचा समूह आकार आहे. त्यासाठी भावभक्ती आवश्यक असते १२, १६ २१००० आणि सहांचा उभार 

माप चाले सोहमकार ओळखले ५२  मात्रेशी lसंत जनाबाई यांनी कोड्यामधून परमेश्वराचे निर्गुण निराकार रूप सगुनच आहे हे सांगितले आहे. परमेश्वराचे रूप अंकाचा खेळ आहे. दिवस व रात्र मिळून तुमचे जे श्वास असतात दहा हजार आठशे व दहा हजार आठशे मिळून ते 21 हजार 600 होतात त्यांचे माप सोहमकार म्हणजे सोहम नामाचा जप श्वास खाली घेणे वर घेणे हे आहे माळेचे मणी 108 असतात. आपण रात्रंदिवस श्वासोस्वासाबरोबर देवाचे नामस्मरण केले तर 21 हजार 600 होतात म्हणजे अनेक सहाषांचा उभार त्याचे माप आहे. सोहमचा जप याची ओळख पटण्यासाठी ५२ बाराखड्याच्या मात्रेत समाविष्ट आहेत असे जनाबाई म्हणतात. चार खोल्या चार घरी चौघी पुरुष सर्वांशी अंतरी राहिले पाचव्यापासी चार खोल्या माणसाच्या जीवनाची अवस्था जागृती, स्वप्न, सुसृप्ती, आणि तुरिया हे सर्व जीवन चार अवस्थांनी व्यापलेला आहे. चार घरी या देहाचे चार प्रकार स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण चार पुरुष धर्म, अर्थ, काम ,मोक्ष चार नारी म्हणजे चार मुक्ती सलोकता, समिपता,  स्वरुपता आणि सायुजता

आणि हे ईश्वर प्राप्तीचे चार प्रकार आहेत. तर ते कोणते देवामध्ये एकरूप होणं, देवाचा सहवास मिळवणं, देवासारखा उच्च आनंद मिळविणे, आणि या सर्वांना मी अंतरात ओळखले आहे. तरीही हे सर्व नश्वर आहेत या सर्वांना मी ओळखते. म्हणून मी पाचव्या सोबत राहते. तो पाचवा परमेश्वर आहे त्याचे निर्गुण निराकार रूप आहे पाच शहाणे पाच मूर्ख पाच चालक असती देख पाच दरोडेखोर आणि ओळखले दोघांशी पाच शहाणे ज्ञानेंद्रिय डोळा, कान, जीभ, नाक व त्वचा पाच मूर्ख कर्मेंद्रिय पाच इंद्रिय चोऱ्या करतात या सर्वांना मला ओळखण्याची गरज नाही, कारण मी दोघांना ओळखले आहे ते दोघे जीव शिव आहेत त्यामुळे इतर आणि हा अध्यात्माचा पसारा या सर्वांची गरज मला नाही. वेदशास्त्राचा शास्त्राची उठाठेव कशासाठी मग परमेश्वराचे रूप जीव-शिव यामध्ये आहे. एका बिजांचा अंकुर होय. वृक्षाची विस्तार शाखा पत्रे, फळ ,फुलभारत, विजापोटी सामावे संत जनाबाई म्हणतात, "एक बी रुजवल्यानंतर त्याचे रूप वृक्षांमध्ये होऊन विस्तारते त्या वृक्षाला पान फुले फळे याचा बहार येतो. त्याचे रूप येण्यामागे कारण म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ असतात. अशाप्रकारे परमेश्वराची देखील शुद्ध आचरणाने भक्ती केली तर परमेश्वर सगुण रूपात साक्षात्कार देतो. कांतीन तंतूशी काढून वरी क्रीडाकरी ती जाण शेवटी तंतूशी गळून एकटी राहते.एखादी कांतीन पहा एका कोपऱ्यात तंतू म्हणजे दोरा आपल्या शरीरातून काढते. त्या तंतू वरती क्रीडा करते शेवटी तोच दोरा गिळत गिळत तिथे जाळे आपल्या पोटात घेते. शेवटी ती एकटीच स्वतः पाशी राहते परमेश्वराचा खेळ असाच असतो. शेवटी तो एकटाच राहतो तो अनंत आहे. त्याचा महिमा जगाच्या पाठीवर शेवटी तो एकांतात राहतो. असेच परमेश्वराचे रूप आहे. वेदशास्त्र आणि पुराना याचा अर्थ अनिता म्हणा कनकी नगाच्या भूषणा अनुभव वाटे जीवाशी वेदशास्त्र पुराण भक्ती यांचा अर्थ आपल्या मनामध्ये लावला आहे. सोने जे असते त्याचे दागिने त्यातही सोनेच असते त्याचाच अनुभव आपणास येतो. तसेच प्रत्येकाने आपल्या अनुभवानुसार परमेश्वर मानला आहे परंतु जीव आणि शिव एकच आहेत हा अद्वैताचा सिद्धांत आहे. ईश्वर व भक्त एकच आहेत असे संत जनाबाई म्हणतात.

 नामदेवाच्या प्रतापात श्री विठोबाचा हात जनी म्हणे केली मात पुसा ज्ञानेश्वराची 

या सर्वांचे ज्ञान मला नामदेवामुळे झाले. माझ्या डोक्यावर विठोबाने हात ठेवला म्हणून जनी म्हणते, मी या सर्वांवर मात केली सर्व अद्विताचा सिद्धांत समजून घेतला आणि पुढे गेले आणि हे कोणाला विचारा म्हणतात, तर संत ज्ञानेश्वराला विचारा काय विचारा तर हा सर्व अध्यात्माचा अद्वैताचा सिद्ध विलासाचा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितला आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अमृतानुभावामध्ये चिदविलासाचा अद्वैताचा सिद्धांत मांडलेला आहे. जीव आणि शिव एकच आहेत. याचे सार फक्त एकोणीस ओवीमध्ये जनाबाईंनी अद्वैताचे ज्ञात ज्ञान सांगितले आहे. हा चमत्कार नामदेवामुळे झाला असे त्या म्हणतात त्या मानाने निर्गुणाचाच सगुण आकार देऊन भक्तीभाव ठेवावा असे त्या म्हणतात. शेवटी संत जनाबाई व संत नामदेवांना नमस्कार करतात आणि जनाबाई या ज्ञानामुळे अशिक्षित आहेत असे मात्र आपणास वाटत नाही.

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!



    भारत देशास स्वराज्य मिळाले परंतु सुराज्य निर्माण करण्यास अजूनही आपण असमर्थ ठरतांना दिसतो. खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य आपण निर्माण करु शकलो नाहीत. सद्यकालीन देशातील निवडणुका, होत असलेले राजकारण, लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा, पैशातून सत्ताकारण व सत्तेतून पैसा कमविणे, मतदार राजाचीही या व्यवस्थेला पोषक असे अनुकरण हया बाबी जगातील सर्वात मोठी मानल्या जाणाऱ्या भारतील लोकशाही समोरील आव्हाने ठरतांना दिसतात. सदरिल परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून लोकशाहीबाबतचे मांडलेले विचार आजही तेवढेच प्रासंगिक वाटतात. महात्मा गांधी म्हणायचे, ‘आमचे प्रतिनिधी जर लोकशाहीचे खरे पुरस्कर्ते असतील तर ते शुध्द मनाने जनतेचा आवाज समजावून घेवून सर्वांचे खरेखुरे हित करण्याचा प्रयत्न करतील आणि कोणताही अन्याय सहन न करता त्या विरुध्द संघटित आवाज उठविण्याची शक्ती त्यावेळी आमच्यात येईल. त्याचवेळी लोकशाही युग सुरु होईल." आजही आमच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची क्षमता सामान्य नागरिकात झालेली दिसत नाही. हे लोकशाहीचे अपयशच आहे. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना मिळालेल्या मतदानाच्या हक्काबाबत विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत कित्येक वर्षापूर्वी मांडलेले आहेत. आधुनिक काळात सर्वसामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्व बिंबवणारा, अस्पृष्यता गाडून टाका असे सांगणारा ग्राम व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणारा सर्व धर्माकडे समानतेने पाहणारा लोकशाही मूल्यांच्या रूजवणुकीसाठी आपल्या भजन, किर्तनाच्या व साहित्याच्या माध्यमातून उज्वल भारताचे स्वप्न पाहणारे संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय. महाराज ग्रामगीतेत मतदानाच्या संदर्भात लिहितात की, मतदान कुणाला करणार? “ऐसे ना करावे वर्तन असतील जे इमानदार सेवकजन तेचि द्यावे निवडोन । एकमते सर्वानी।। (ग्रामगीता अ. 10 ओवी 90) आदर्श लोकशाहीच्या दृष्टीने महाराजांचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. लोकशाहीच्या पोवाडयात ते लिहितात की, “व्हा सावधान लोकहो! उभारूनि बाहो, देशाचे भवितव्य ठरणार | पुढारी दारोदारी फिरणार तुम्ही मतदान कुणा करणार? होऽऽजी”

      मतदानाचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे. समाजात वेगवेगळ्या निवडणुकीत काय घडामोडी घडतात, हे आपण पाहत असतो. प्रशासन पारदर्शी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करीत असते. भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानेच आचारसंहिता पाळली व जात, पैसा, बळ, धाक यास आपण बळी पडलो नाही तर योग्य उमेदवार निवडून देऊन या लोकशाहीच्या उभारणीत आपले योगदान ठरेल हे मात्र नक्की.

भगतसिंग, सुखदेव आदींनी आपले जीवन या देशाच्या कामी लावले म्हणून महाराज भजनातून तरूणांना सावध करतात. ज्या भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले की, "सेवा करन को दास की, तो पर्वा नहीं है जान की" हे सांगताना अर्जुना या कौरवांना सोडू नको असे तरुणांनो या भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका असा सुचक उपदेश आपणांस मिळतो. या देशाच्या अशा नराधमांनी देशास कंगाल बनविले. देशास विविध समस्यांनी ग्रासले. देशास स्वराज्य मिळाले आता सुराज्य होण्यासाठी आपण आपले योग्य मत देऊन देश कार्य करूया स्वराज्याला सुराज्यात परावर्तीत करण्यासाठी लोकशाहीला सफल, यशस्वी बनविण्यासाठी खेडयातील जनतेला तिच्या हक्काची, कर्तव्याची जाणीव लोकभाषेतून करून देण्याचे कार्य प्रत्येक जाणत्या व्यक्तीने आज केले पाहिजे तरच राष्ट्राचे भवितव्य उज्वल होणार आहे. लोकांकडून अशी अपेक्षा महाराजांनी दि.१५ ऑगस्ट १९५३ ला लेखातून व्यक्त केली होती परंतु आजही त्यांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकलेलो नाही आपण जात, धर्म, पंथ, लिंग, वंश व पक्ष या पलीकडे गेलो नाहीत. महाराज म्हणतात, "मित्रांनों, जनतेला मिळालेले स्वराज्य ही खऱ्या सुराज्य मंदिराची केवळ किल्ली आहे. जनतेला स्वराज्य मिळालेले आहे. आपल्या न्याय इच्छा प्रकट करण्याचे आपला उचित आवाज उठविण्याचे व आपल्या योग्य कार्यकर्त्यांना निवडून पुढे आणावयाचे! हे स्वातंत्र्यच उद्याच्या स्वर्गसमसंसाराचा पाया आहे. याचा उपयोग करून घेतल्यास साऱ्या राष्ट्रात सुखशांतीचे व प्रगतीचे उच्च वातावरण निर्माण होणार आहे. रामराज्याची संकल्पना सामुदायिक इच्छाशक्ती म्हणजेच सरकार अशी भावना दृढविश्वास महाराजांचा होता. नितीमान, त्यागी, मानवधर्मी, उज्वल, चारित्रवान निर्भिड अशा जनसेवकांना पुढे आणणे, त्यांच्या हाती सत्ता देणे यातूनच देश विकसित होईल. तिच खऱ्या अर्थाने लोकशाही असेल अशी भावना महाराजांची होती परंतु आज सर्वात मोठी लोकशाही म्हटल्या जाणाऱ्या देशात मात्र नितीमान, चारित्रवान, त्यागी राज्यकर्ते शोधण्याचा प्रयत्न केल्यास निराशाच हाती लागते.

      लोकशाहीची व्याख्या महाराजांनी अतिशय अर्थपूर्ण केली. तिच म्हणावी लोकशाही जिथे कुणी कामचुकार नाही देशातील प्रत्येक घटकाची काही एक जबाबदारी आहे. प्रत्येकाचे समाज, देश विकासासाठी योगदान आवश्यक आहे. सहकार, सामुदायिकतेतून ते साकार होणार आहे असे मुलगामी विचार महाराजांनी मांडलेले आहेत. लोकशाहीच्या व्याख्येतून नागरिकांची कर्तव्ये स्पष्ट होतात. आपल्या देशाचा उध्दार करावयाचा असेल तर जात-धर्माच्या प्रचारकांनी एकत्र यावे असे ते म्हणतात. पुढे ते म्हणतात, “मतदान नव्हे करमणुक

निवडणुक नव्हे बाजार चुणूक निवडणूक ही संधि अचूक भवितव्याची' (ग्रामगीता अ. 10 ओवी 98 ) राष्ट्रसंत मतदारांना इशाराच आपल्या ग्रामगीतेतून देतात, "ऐसा नकोच पुढारी ज्याने नाही केली कर्तबगारी ते मित्र नव्हे वैरी समजतो आम्ही' जनतेची सेवा कामे करणारा उमेदवारच आपण एकमताने निवडून द्यावा असे ते सांगतात.आपल्याकडून जर सत्पात्र उमेदवार निवडला नाही तर ते म्हणतात, 'दूर्जन होतील शिरजोर आपल्या मताचा मिळता आधार सर्व गावांशी करतील जर्जर, न कळता सत्पात्री मतदान' म्हणून प्रत्येक मतदाराने विचार करावा व गुंड, भ्रष्टाचारी उमेदवार निवडून देऊ नये. स्वार्थासाठी सेवेचे सोंगे करू नका, प्रलोभने देवून मते घेवू नका, उमेदवारानीही आपले मत विकू नये असे प्रासं व महत्वाचे विचार महाराजांचे साहित्य देते. मत हे दुधारी तलवार आहे. मतदार व पुढायाने महाराजांचे प्रस्तुत विचार काटेकोरपणे आचरणात आणले तर महाराजांच्या स्वप्नातील भू-वैकुंठ भारतास बनण्यास वेळ लागणार नाही.

मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नाही. मौज मजा करण्याचाही दिवस नाही. तो आहे कर्तव्याचा दिवस. आपले नेतृत्व निवडून देण्याचा दिवस. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. ज्या दिवशी या देशांमध्ये शंभर टक्के मतदान होईल तोच खरा यशस्वी लोकशाहीचा सुवर्ण दिवस असेल.

चला तर मग आपले राष्ट्रीय 

कर्तव्य बजाऊ व इतरांनाही प्रवृत्त करू!

प्रा. डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे,

मराठी विभागप्रमुख,

श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी

pralhadbhope@gmail.com


रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

हैद्राबादची निजामशाही - वाचनीय

हैद्राबादची निजामशाही                  
       
       17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता 200 वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. 
         निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. 1724 ला मोगलांचा सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. 1767 नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्‍या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो. 
           15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास 565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण 16 जिल्ह्याचा समावेश होता.  
             22 हजार 360 खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38 हजार, 534 एवढी होती. त्यात 85 % हिंदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528 होती. एकूण क्षेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती. अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी 15 कोटीचे उत्पन्न मिळत होते. 
        हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, 1883 पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे 21 विभाग काढून त्याद्वारे गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे 1910 पर्यंत निजामाकडे जमा होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते. 
        1910 पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्‍याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील 565 संस्थानात 21 तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता. 
        1800 साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबादजवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिंकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात निजामाने 28000 रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली. 
          1911 ते 1948 ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय 1921 सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात
नापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”
       राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्‍या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सारकाही व्यवस्थित चालू होतं. 
        मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एक्या अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 
        सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे 1947 – 48 चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे शिकले त्यांचा इतिहास पुस्तकात आला परंतु अनेक अशी मंडळी आहे त्यांना अजूनही इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची 15 - 20 माणसं रझाकारांनी कापून काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही. म्हणूनच उस्मानाबाद आकाशवाणीच्यावतीने “ हैद्राबाद मुक्तिसंग्रामात, असे झुंजलो आम्ही ” नावाची मालिका सादर करून दुर्लक्षित इतिहास आपल्या समोर मांडला जाईल. अशा या दुर्लक्षित वीरांना समाजासमोर मांडणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. 
                                                                                                                               प्रा. डॉ. सतीश कदम, उस्मानाबाद, ९४२२६५००४४

उपेक्षितांच्या वेदनेचा आशावादी हुंकार - मारोती कसाबांची कविता

उपेक्षितांच्या वेदनेचा आशावादी हुंकार - मारोती कसाबांची कविता 
डॉ. प्रल्हाद भोपे
सहयोगी प्राध्यापक व 
मराठी पदवी व पदव्युत्तर विभागप्रमुख
श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी

साहित्य समाज आणि संस्कृतीमध्ये कविता या वाडमय प्रकाराचा मौलिक वाटा आहे. मानवी जीवन हेच एक काव्य आहे असे म्हटले तर वावगे ठरत नाही. मानवी भावनेला आवाहन करण्याचे कार्य कविता करते तर विविध विचारांना गती देण्याचे कार्य गद्य लेखन करते. कविता हा सर्जनशील व संवेदनशील असा वाडमय प्रकार आहे. सर्वच साहित्य प्रकारात कवितेचा इतिहास हा प्राचीन व सर्वात मोठा आहे. कारण मनुष्याची पहिली अभिव्यक्ती कविता असली पाहिजे. मॅथ्यू अर्नोल्ड तर poetry is the criticism of life म्हणजे "साहित्य जीवन भाषा असते" म्हणतो. २००० नंतरच्या या मराठी काव्य प्रांतांमध्ये आपले योगदान देणारी व उपेक्षितांच्या वेदनेचा हुंकार ठरणारी मानवी जगण्याचे आशावादी सूर मांडणारी कविता म्हणून मराठवाड्यातील उदयन्मुख कवीमध्ये कवी मारोती कसाब यांच्या कवितेचा उल्लेख करावा लागतो. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'पोरगं शेकत बसलं' इ.स. २००५ साली मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केला व मराठी कवितेच्या प्रांगणात त्यांचा प्रवेश झाला. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कवितेची प्रमुख प्रेरणा आहे.
आपल्या कवितेविषयी ते म्हणतात की, "कविता ही माझी जीवनसंगिनी, श्वास आणि ध्यास आहे. कळत्या वयापासून तिची मला सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती मला भेटली. परिस्थितीच्या रेट्याने जेव्हा जेव्हा कोलमडलो तेव्हा तिनेच मला आवरले, सावरले हे तिचे थोर उपकार घेऊनच मी जगत आलो.'' त्यांचा तब्बल पंधरा वर्षांनी दुसरा कवितासंग्रह 'रात्रंदिन असे' २०२१ मध्ये गणगोत प्रकाशनने प्रकाशित केला. कोंडलेले श्वास, सततचा दुष्काळ, समाज जीवनातील विसंवाद, बेकारी, राजकारणातील अनैतिकता, देवाच्या दरबारातील शोषण, असत्याचा पराजय आणि सत्याचा विजय, दुःख वेदना, नकार आणि विद्रोह ही त्यांच्या कवितेची बलस्थाने आहेत. प्रस्थापित व्यवस्थेला नकार देणारी त्यांची कविता स्वप्नाळू नसून कठोर वास्तवाला संयतपणे सामोरे जाणारी आहे. ती आत्मशोध घेत आशावादी जीवनाची सजग वाटचाल करणारी आहे. त्यांची कविता २००० नंतरच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने रंगविणाऱ्या कविता आहे. त्यांच्या कवितेचा वेग कमी असला तरी सजगपणे आणि सहजपणे परिवर्तनाच्या दिशेने झेपावणारी त्यांची कविता आहे. मानवी जीवनाचे व्यामिश्र दर्शन ती घडवताना दिसते. संत तुकारामाच्या कवितेशी नाळ जोडणारी त्यांची कविता आहे. समकालीन प्रश्‍नांकडे त्यांची कविता गंभीरपणे पाहत, वर्तमानाचा वेध घेत, इतिहासाचे दाखले देत भविष्यातील संभाव्य धोके ती सांगते. महामानवाच्या विचारांवर उभी असलेली ही कविता परिवर्तनाची दिशा सूचित करते. नवा समताधिष्ठित शोषण विरहित समाज रचनेसाठीकवी आणि कवितेचा आग्रह कायम राहिलेला आहे. कवी हा त्या त्या काळाचा साक्षीदार असतो. जे अनुभवाला आले. प्रखर अनुभव विश्व काव्य विश्व बनते. त्यांच्या कवितेविषयी डॉ. राजकुमार मस्के म्हणतात, "कवी कसाब यांच्या कवितेला कलात्मक सौंदर्य प्राप्त झालेले आहे. कविता चैतन्यशाली व्यक्तिमत्त्वानं 'पोरगं शेकत बसलं' मधील कविता भावगर्भ झालेली आहे. या कवितेला स्वतःची एक लय, स्वतःचाच एक सुंदर आकार आहे." 
विशेष म्हणजे त्यांनी हा कविता संग्रह 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या ध्येयाने प्रेरित उदगीरच्या सीमा भागात ज्ञानगंगा पोहोचविणाऱ्या कै. बापूसाहेब एकंबेकर पाटील कै. पी. जी. पाटील, ॲड. सी. पी. पाटील, मा. अशोकराव पाटील यांच्या कार्याला व किसान शिक्षण प्रसारक मंडळास अर्पण केलेला आहे.
कवी मारुती कसाब् यांचा जन्मच प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच दुष्काळामध्ये झालेला होता. गाणे गाण्याचा व कविता करण्याचा वारसा कवी कसाब यांना त्यांच्या आईकडून लहानपणीच मिळाला. चौथीला असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गीत गाणं हा छंद कवीला लागला होता. त्यामुळे ते सर्वांचे आवडते होते. शाळेमध्ये सुद्धा ते सर्व गुरुजींचे आवडते होते. चौथी नंतर ते मामाच्या गावाला शिकायला गेले. त्याच्या मामाकडे गावची गावकी होती. फडे, टोपले गावात विकायचे. सगळ्या देवापुढ शहाडा वाजवायचा. रात्री प्रत्येक घरासमोर जाऊन भाकरी मागायचे. शेतात खळ बलुतं मागायचं. त्यावेळस लोक मात्र गाणं त्यांना म्हणायला लावायचे. सेलूच्या नूतन महाविद्यालयात नंतर अकरावीला प्रवेश त्यांनी घेतला. डॉ.गोपले यांच्या चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. उफडे फोडणे, पोतराजांची केस कापणे असं सगळी मांगकी सोडण्याचे कार्यक्रम गावोगावी सुरू होते. त्यावेळी गावोगाव अत्याचारही मांगावर सुरू झाले होते. या सर्वांचा प्रभाव कवी वर पडला. लहुजी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रभावित होऊन कवी चळवळीत सामील होऊ लागले. मोर्चात गाणी म्हणायला घोषणा द्यायला लागले. पुढे लालबावटा, छात्रभारतीचे कामही त्यांनी केले. अशाप्रकारे शिक्षण आणि चळवळ एकाच वेळी त्यांची सुरू होती. चळवळीत काम करत असताना फुले-शाहू-आंबेडकर, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, इंद्रजीत भालेराव, संतांचे साहित्य त्यांनी वाचलं.
कवी मारुती कसाब यांची पहिली कविता दै. मराठवाड्याच्या चिगूर या पुरवणीत १९९३ साली प्रकाशित झाली. औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असताना डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. एस. एस. भोसले, डॉ. शरद व्यवहारे, डॉ. सुदाम जाधव, प्रा. अरविंद कुरुंदकर यांच्या सानिध्यात कविता बहरली. 
उच्च शिक्षण झाल्यानंतरही कवीची भटकंती थांबली नाही. मानवत, परभणी, माहूर गेवराई, बीड येथे नोकरीच्या निमित्ताने ते राहिले. त्यामुळे विविध रंगाची ढंगाची माणसं वाचता आली. त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांची कविता खऱ्या अर्थाने जगवली. 
कवी नारायण सुर्वे यांच्या शब्दांमध्ये 
काही पाहिलेले काही साहिलेले आहे 
जसा शब्दात आहे तसा जगात आहे. 
माझ्या जगण्याची गंधवेणा त्यात आहे
मी कामगार आहे, तळपती तलवार आहे सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे."
अशीच नाळ कवी मारुती कसाब यांच्या कवितेची मला दिसते.
पोरगं शेकत बसले या कवितासंग्रहातील कविता त्यांच्या अनुभूती आहेत. त्यांच्या जीवन कथा आहेत. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही अशा तमाम उच्चशिक्षित तरुणाची खंत व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. .शिकून-सवरूननही स्वप्न पूर्ण होत नाहीत त्यांची खंत कवीला वाटते 
ल्योक शिकून 
सायब व्हईन 
आम्हाला न्हाई
निदान त्याची त्याला 
पोटाला पोटभर खाईन
ही माफक अपेक्षाही पूर्ण होत नाही म्हणून 
आता 
पोरगं शेकत बसलय  
समद्या डिगर्या पेटवून  
निदान
 तेवढीच उब 
माय-बापाच्या थरथरत्या देहाला !
त्यांची कविता साज-शृंगार लेणारी नसून वेदनेचा अंगार लेणारी आहे. प्रयत्न करूनही अडचणीत सापडलेला एक तरुण त्यांच्या कवितेतून सातत्याने दिसतो. त्यांची कविता विश्वात्मकता धारण करते. कारण ती त्यांची कविता केवळ त्यांची राहत नसून सकल अशा अडचण ग्रस्त तरुणांची ती होते. हेच त्यांच्या कवितेचे यश आहे 
केवळ कारकून बनविणाऱ्या शिक्षण पद्धतीवरही कडाडून त्यांची कविता हल्ला करते. कवितेच्या प्रस्तावनेतच सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब म्हणतात की "कवी मारोती कसाब यांची कविता नाचत मुरडत नखरे करीत येत नाही. तिला शृंगार नखरे माहित नाहीत. ती नाटकी नाही ती सरळ सूट आणि बेधडक आहे." संत साहित्याने ही कवी व कवितेची कविता प्रभावित झालेली दिसते.
गुणवत्तेचे पार 
निघाले दिवाळी 
सत्तेचे सोहळे 
चाललेले…
-----------
पंढरपुरात 
बडव्यांचा मौजा 
त्यांच्याच फौजा
विठू भोवती
-------------
राजकारणाने 
धूर्त मोठे झाले 
प्रज्ञावंत राहिले 
झोपडीत…
अशी कितीतरी उदाहरणे कवी देतो. अनुभवास आलेली परिस्थिती, अन्याय, शोषण, अत्याचार 
यामुळे कवीचे मन बेचैन व हतबल झालेले आहे त्यास आलेली अस्वस्थता त्याला स्वस्थ बसू देत नाही व तो लिहिता होतो त्यांच्या सर्वच कविता सामाजिक जाणिवेचे आहेत स्वतः बद्दल बोलताना सामाजिक संदर्भ कवी घेतो. दुष्काळाची होरपळ त्यांची कविता मांडते. आपल्या आई बापाचे कष्ट, आईचे हाल अत्यंत मार्मिक शब्दात व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. सत्यदर्शन त्यांची कविता घडवते.
जिथे तिथे दिसे
 खोटयांचा बाजार
 खऱ्याची माय 
कोण्या गावा गेली?
अशी सुरुवात करून   
देवळात जत्रा भरली पाप्यांची 
पुण्यवंत दारी…. पेंगुळले
असा प्रवास करीत शेवटी कवी 
सत्य हाच धर्म सांगतो
सत्य एक धर्म 
सत्य एक वर्म
 सत्याचेच मर्म
 सांगतो मी…
लोकसंस्कृतीचा स्पर्श त्यांच्या कवितेला आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेला आहे.ज्या महामानवांनी दलितांच्या आयुष्याला नवी दिशा दिली त्या महामानवांच्या कार्याचा आणि नावाचाही उल्लेख त्यांची कविता करते. ती त्यांची श्रद्धास्थाने आहेत.
लहू-फुले-शाहू
आंबेडकर-आण्णाभाऊ
विचार तयाचे घेऊन 
समतेच्या गावा जाऊ!
महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारी कसाब यांची कविता आहे. ७२चा दुष्काळ, वाढण, पोरगं शेकत बसलय या कविता अस्वस्थ करणाऱ्या आहेत. सात जन्माचे दारिद्र्य आणि भुकीची व्यथा प्रकट करताना कवीच्या अभिव्यक्तीला कधी त्वेषाची धार चढून जाते ते आपल्यालाही कळत नाही.
कवी म्हणतो 
तेव्हा दोस्त हो,
उसळत्या लेखणी बरोबर
आता गंजलेली 
ढोर फाडण्याची जुनी हत्यारही 
पाजळून ठेवायला 
विसरू नका !
अशाप्रकारे संत तुकारामाच्या कवितेप्रमाणे विद्रोहही कसाब यांच्या कवितेमध्ये दिसतो.
कवितेच्या निर्मितीबाबत ते म्हणतात, 
कविता जगवते 
कविता जागवते 
माणसाला माणुसकीपर्यंत 
पोहोचविते कविता!!
'आयुष्याचा चिंतन, कवितेमधून इतकी कुणाची किव करण्याचा व संवेदनशील राहण्याचा जमाना नाही यावर वास्तव चिंतन प्रगट केले आहे.
खरे बोलणारे तोंड शिवून घ्यावे अन्याय-अत्याचार उघड्या डोळ्याने 
पहावे 
आलाच दारावर भिकारी
 तर पुढच्या घरी जाण्याचा 
खुशाल सल्ला द्यावा अन् 
टीव्हीवरील छ्बी पहात 
आपण सुखाचा घास घ्यावा!
या देशात दगडात देव दिसतो पण माणसात देव दिसत नाही माणसाला अजूनही स्वीकारल्या जात नाही या सर्व बाबींची चीड कवीच्या मनामध्ये आहे. कवी म्हणतो, 
आम्ही त्यांचे पाय धरावेत 
आणि त्यांनी सणसणीत लाथ द्यावी 
ढुंगणावर. 
 हीच उफराटी संस्कृती 
नांदे इथे माझ्या बापा…
   कसं सांगू तुला मनुने मारून ठेवलेली मेख ढिली होत नाही अजूनही 
समतेच्या पाण्यानं 
माझ्या बापा !!!
कवी कसाब यांची प्रत्येक कविता जगण्याचं तत्त्वज्ञान मानते. कवितेचे शीर्षकही आशयपूर्ण आहेत. वाचकांची जिज्ञासा जागृत करणारे आहेत. कविता वाचल्याबरोबर कोणालाही सहज समजावी असी सुलभता कवीने जाणीवपूर्वक वापरलेली दिसते. विविसाव्या शतकातील तीव्र सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे मारुती कसा भी तत्वनिष्ठ शिक्षक उत्तम संशोधक आणि चळवळीचे जाणीव असणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा तब्बल पंधरा वर्षानंतर दुसरा कवितासंग्रह 'रातंदिन असे' हा प्रकाशित झाला. उपेक्षित समाजाच्या करुण वेदनेची कहाणी म्हणजे त्यांच्या कविता होत. तथगत बुद्ध, छत्रपती शिवराय, संत बसवेश्वर, चार्वाक, संत तुकाराम,संत नामदेव संत कबीर, लहु साळवे, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे यांचे समतेचे विचार त्यांची कविता व्यक्त करते. 'बुद्ध माझा' ही त्यांची कविता बुद्धाचे तत्त्वज्ञान विशद करणारी आहे.
मायेचे माहेर I प्रज्ञेचे सागर I
 करुणा सागर I बुद्ध माझा II
अष्टांग मार्ग हा I बुद्धाने दाविला I
जन्म उद्धरिला I मानवाचा II
तुकाराम एक तत्व आहे. तुकाराम एक विचार आहे. ज्याने ज्याने तो अंगीकारला तो धन्य झाला. हा विचार त्यांची कविता करते. 
तुका ध्यानी धरा I तुका मनी धरा I
रात्रंदिनी स्मरा I तुकाराम II
बुडणार नाही I पुन्हा कधी गाथा I
सावध सर्वथा I होऊया रे II
माय बाई, आदिमाया, कामवाल्या बाया, कुठे जात असलेल्या मुली, प्रिय मुक्ता,स्तनयोनी आदी कविता स्त्री जाणिवेच्या आणि तिच्या त्यागाच्या निदर्शक आहेत. 'तू दुधावरची साय' कवितेतून आई विषयीचा कृतज्ञताभाव ते व्यक्त करतात. जाती संपुष्टात याव्यात आणि सर्वत्र मानवता नांदावी असा आशावाद कवी पेरताना दिसतो.
जाती धर्मापेक्षा I माणूसच मोठा शोई
भेदभाव खोटा I सजिवांत II
नदीच्या जाण्याने सारे गेले ही भावना रसिक वाचकाचे मन गलबलून टाकणारी आहे. गांधी मरत नाहीत तसेच अण्णा तुम्ही वाहत आहे आमच्या नसानसातून ही हमी कवी कसाब 'हमी' कवितेतून देतात. चला चाल करुया, फकिरा पुन्हा येणार आहे! नव्या समताधिष्ठित, शोषण विरहित समाज रचनेस साहाय्यभूत ठरणाऱ्या आहेत.
संदर्भ ग्रंथ
1.'पोरगं शेकत बसलं' - मारोती कसाब
2.'रात्रंदिन असे' - मारोती कसाब


मराठवाडा मुक्तीसंग्राम समजून घेताना...

मराठवाडा मुक्तीसंग्राम समजून घेताना

मराठवाडा मुक्तीसंग्राम समजून घ्यावा लागतो, जाणावा लागतो, काळ आणि घटनांची संगती लावावी लागते. मुक्ती संग्रामाच्या इतिहासात अन्याय आणि अन्यायाविरुध्द प्रखर संघर्ष पाहायला मिळतो. त्याची गोळाबेरीज करावी लागते. तरच हा इतिहास त्यागाचा, शौर्याचा होता हे अनुभवता येते.

एकीकडे शेकडो वर्षाची राजवट ज्याला आपण दुसऱ्या भाषेत शेकडो वर्षाची गुलामी असही म्हणू शकतो. हा लढा भारत स्वतंत्र झाल्यावर म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ ला सुरु झाला का? असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर नाही असे त्याचे उत्तर आहे.

संपूर्ण देशच पारतंत्र्यात होता, त्यामुळे मराठवाडयाचे पारतंत्र्य वेगळे कसे वाटणार? जणू मराठवाडा हा पारतंत्र भारताचा हिस्साच होता. ही भावना निजामी राजवटीतील जनतेमध्ये होती. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाडयालाही स्वातंत्र्य हवे ही भावना जागृत झाली आणि निजामी राजवटीविरुध्द संघर्ष पेटला. तो लढा १७ सप्टेंबर १९४८ रोजी थांबला. या कालावधीत घडलेल्या संघर्षाला मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हटले जाते.

या संघार्षाचे वेगवेगळे स्वरुप पाहायला मिळतात. एक लढा महात्मा गांधीच्या अहिंसावादी तत्वाने चालला आणि दुसरा सशस्त्र मार्गाने चालला. ज्याला मवाळवादी आणि जहालवादी असेही म्हटले जाते. या दोन्ही मार्गाने चालेल्या लढयाचे हेतू एकच, स्वातंत्र्य. पण मार्ग भिन्न होते. अहिंसावादी विचाराचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. तर सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतीविरांचे नेतृत्व हे वेगवेगळे होते. या सशस्त्र क्रांतीच्या विचाराला चालना देणारे केंद्र स्वतंत्र भारत आणि निजाम राजवट यांच्या सिमेवर कॅम्पामधून कार्यरत होते.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास मांडतांना नव्या पिढी समोर एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी की, हा लढा केवळ तेरा महिने दोन दिवसाचा असला तीरी गुलामी मात्र शेकडो वर्षाची होती. औरंगजेबाने आदिलशाहीचा पराभव करुन निजाम स्थापित केला. निजाम म्हणजे व्यवस्थापक, पुढे औरंगजेबाचे देहावसान झाले आणि जे निजाम व्यवस्थापक होते ते स्वतःचे राजे झाले. एकूणच काय तर सोळाव्या शतकाच्या आदिलशीच्या पदानंतर निजामशाहीने सतरावे, अठरावे आणि एकोणिसाव्या शतकाच्या ४८ वर्षे उजाडेपर्यंत मराठवाडयावर राज्य केले.. औरंगजेब राजवटीपूर्वीही हा प्रदेश गुलाम होताच. यावरून एका अर्थाने गुलामीचा काळ तुम्हाला मोजता येईल.

मुक्ती संघर्षाचा लढा काळाच्या कसोटीवर अलपकाळ वाटत असला तरी या संघर्षाने काळाच्या उदरातील शेकडो वर्षाच्या गुलामीला झुगारून लावले. त्यामुळे हा लढा स्वाभिमानाचा आणि त्यागाचा होता. गुलामीच्या काळाने लढाऊपणाची उर्मींच मारुन टाकली होती. ती उर्मी जागी करुन राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. याच भावनेसाठी शेकडो लोकांनी बलिदान केले, घरावर तुळशीपत्र ठेवले, जीव दिले आणि जीव घेतले सुध्दा.

गुलामीच्या काळाचे संदर्भ मोजले तर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की, मराठवाडा हा भारतात सर्वाधिक जास्त गुलाम राहिलेला प्रदेश आहे. मराठवाडयाचे पाच जिल्हे, कर्नाटकाचे तीन जिल्हे आणि तेलंगणाचे तीन जिल्हे एवढेच काय ते निजामाचे राज्य होते असे भूभागावरून मानयता येईल. मात्र निजाम हा जगातील सर्वात श्रीमंत राजा होता, धूर्त आणि धोरणी होता. त्यामुळेच भारताच्या इतर भागात घडलेल्या राजकीय क्रांतीचा निजामशीवर खुपच कमी परिणाम झालेला जाणवतो. मराठवाडयातील जनता इतर राजवटीशी तुला करायचेही कष्ट घेतांना दिसत नव्हती. जणू काही हेच आपले प्राक्तन आहे असे त्यांनी पक्के ठरविले होते..

राजवटी बदलल्या, राजे बदलले पण गुलामीचा कलंक मिटलाच नाही. ही गुलामी अंगात मुरुन गेली. राष्ट्रवादसंपला, स्वाभिमान संपला, गौरवशाली इतिहासाची पाने स्मृतीतून हटवून टाकली. त्या मातीचे काय होणार? पिढी दर पिढी हे चालत आले. त्यामुळे स्वातंत्र्याची उर्मी दाटण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढयाचा॥२॥

आदर्श घ्यावा लागला. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि हैद्राबाद संस्थानातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. लढाऊ बाणा लोप पावलेला होता, तो जागा झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली आणि महात्मा गांधीचा आदर्श घेऊन वेगवेगळया नावाने आंदोलने सुरु झाली. या लढयाने निशस्त्र तरीही निजाम सरकारला हादरवून टाकले. ही एक प्रचंड मोठी, प्रचंड सहनशक्ती असलेले वादळ होते. यासोबतच एक जहालवादी चळवळ सुरु होती. त्याला दुसऱ्या भाषेत सशस्त्र लढा असे म्हटले तरी चालेल. निजाम राजवटीच्या हद्दीबाहेर आणि स्वतंत्र भारताच्या हद्दीमध्ये विविध कॅम्पमधून ही चळवळ कार्यरत होती आणि प्रचंड आक्रमक सुध्दा होती.. जहालवादी आणि मवाळवादी यांचा प्रत्यक्ष परस्पर संबंध कधीच आला नाही. जो आला असेल तो व्यक्तिगत पातळीवर, व्यक्तिगत आस्थेपोटी. या दोन्हीही चळवळीचे योगदान निर्विवाद मोठे होते.

निजाम श्रीमंत आणि चतुर असा मोगलांचा व्यवस्थापक होता. पुढे तोच राजा झाला. प्रशासन व्यवस्था चोख असल्यामुळे अनेक शतके त्यांनी राज्य केले. पेशवाईच्या काळात राक्षस भवनच्या लढाईत निजामाला पेशव्याने पराभूत केले. मात्र चौथाईचा करार करुन पुन्हा एकदा मराठवाडा गुलामीच्या जंजाळात अडकून पडला..

१९४७ ला भारताच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य तळपला आणि त्या प्रकाशात मराठवाडयाने आपल्या मुक्तीच्या मशाली पेटवल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा चौफेर दिशेनी आक्रमक झाला. मवाळवादी आणि जहालवादी अशा दोघांनीही एकाच शत्रूवर वेगवेगळया मार्गाने हल्ले करायला सुरुवात केली. अखेर १७ सप्टेंबर १९४७ रोजी हा प्रदीर्घ काळ चाललेला लढा समाप्त झाला. केवळ मराठवाडा स्वतंत्र झाला एवढया समजुतीने आपण समाधानी पावतो. मात्र शत शतकांची गुलामी नष्ट झाली हे वास्तव आपल्या ध्यानी मनी येत नाही. त्यामुळेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास समजून घ्यावा लागतो असे की पहिल्यांदाच नमूद केले आहे.

मवाळवादी गटाने हातात शस्त्र धरली नसली तरीही महात्मा गांधीनी निर्माण करुन दिलेल्या अहिंसावादी मार्गाने हा लढलेला सुध्दा प्रेरणादायीच आहे. कारण या मार्गाने लढल्यामुळे हा लढा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला. सर्व सामान्य माणूस झोपेतून उठतो तेव्हाच शक्तीशाली, जुलमी सत्तांच्या पोटामध्ये भितीचा गोळा उठत असतो.

या जोडीलाच हिंसा करण्यासाठी नाही तर सत्तेला धाक निर्माण करण्यासाठी ज्यांनी शस्त्र हातात घेतली ते लढे सुध्दा तेवढेच प्रेरणादायी आणि उचित होते. निशस्त्र आणि सशस्त्र या दोन्ही लढयांना अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्यक्ष लढयात लढलेले लोक या एकमेकांच्या मार्गावर कधीच टीका टिप्पणी करतांना आढळत नाहीत. किंबहूना प्रत्येकाचा मार्ग स्वतंत्र होता आणि त्यांना इतरांच्या मार्गावर, मार्गाबद्दल काही तक्रार नव्हती. होता तो आदर

असे असले तरीही अहिंसावादी मार्गाने लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे संदर्भ शासन दरबारी सापडतात. मात्र, सशस्त्र लढयामध्ये सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा नाम उल्लेख एखाद्या दप्तरात मिळेलच याची शाश्वती नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर क्रांतीवीर काकासाहेब देशमुख यांनी गौताळा अभयारण्यातील ७०-८० खेडयातील तरुणांना घेऊन सशस्त्र लढा दिला, शेकडो रजाकारांना यमसदनी पाठविले. शेकडो पोलिसांनी काकासाहेब देशमुख यांच्या मागावर राहून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कधीही निजाम पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. त्यांनी केलेल्या अनेक कृती निजाम राजवटीच्या दृष्टीने बेकायदेशीर होत्या. मात्र, त्या तत्कालीन शासन दरबारात दप्तरात सापडतीलच याची खात्री देता येत नाही. असेच दुसरे उदाहरण लातूर जिल्हयातील मातोळा येथील क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचेही देता येते. त्यांना दस्तुरखुद्द तत्कालीन निजाम कलेक्टर मोहमंद हैदर यांनी "Matola Devil on hourse back" अशी पदवी दिली. दत्तोबा भोसले निजामा विरुध्द प्रखर लढा दिला, पण पोलिसांच्या हाती लागलेच नाहीत, सेलूचा हप्ता लुटणे, अपसींगा पोलीस स्टेशन जाळणे, नाईचाकुर पोलीस स्टेशनवर हमला करुन शस्त्रास्त्रे लुटणे, देवताळा येथील शेकडो रजाकार कापले अशा त्यांच्या कितीतरी शौर्याच्या कहाण्या गावोगाव चावडीवर अजुनही सांगितल्या जातात. न्यायालयीन लढाई करण्यासाठी आरोपी पकडला जावा लागतो. संशयावरुन गुन्हा दाखल करणे एवढीच काय ती प्रक्रिया होत असे. या प्रत्यक्ष लढाईचा, संघर्षाचा काळ खुपच कमी होता, त्यातही शेवटच्या दोन वर्षात अचानक वेगाने घडामोडी घडत गेल्या, एकाच वेळी सर्वच भागात अशा घटना घडत गेल्या. सिमेवर स्थापन केलेल्या कॅम्प रचनेतून अनेक गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. उदाहरण सांगायचे तर वैजापूर तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी विजेंद्र काबरा यांनी सुध्दा अनेक गावे स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. चिंचोली व मुक्तापूर असेच स्वतंत्र झाल्याच्या घोषणा झाल्या. या सर्व घटना एकमेकांशी संलग्न नव्हत्या. कोणत्याही अर्थाने त्यांचा एकमेकांशी संबंध नव्हता. त्यामुळे त्या स्वतंत्रपणे मांडल्या जातात. काकासाहेब देशमुख असो की, क्रांतीवीर दत्तोबा भोसले असोत त्या सगळयांचे हेतू एकच होते. मात्र, संघर्षाचे मैदान, नेते, व्यक्तिगत विचारधारा हया सुध्दा वेगळया वेगळया होत्या. त्यातही सशस्त्र लढयाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येतं की, ते मुळातच धाडसी आणि आक्रमक असल्यामुळे, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गुप्तपणे व्हायच्या, घटना घडून गेल्यावर लोकांना कळायची, तशीच ती निजामी पोलिसांना कळायची, त्याची चर्चा नंतर व्हायची.

या संपूर्ण सशस्त्र लढयाला एक नेतृत्व नव्हते. त्याला साधणारा समान दुवा नव्हता. त्यामुळे आपआपल्या ताकतीप्रमाणे ते लढत गेले. या लढयात सुध्दा अनेकांचे बलिदान झाले आहे. केवळ हाती शस्त्र घेतले होते. म्हणून त्यांचे बलिदान व्यर्थ समजण्याचे काहीच कारण नाही.

मुळात रझाकार ही गोष्ट निजाम राजवटीत आधीपासून नव्हती. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतर निजामाला संरक्षणासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली. मग धर्माच्या नावाने लोक लवकर उभे राहतात, त्यांना पगार द्यावा लागत नाही, ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे, पण धर्मासाठी लढतात. याच भावनेतून रझाकार अवतरले आणि पुढे संपूर्ण इतिहास घडला.

मराठवाडा शेकडो वर्षे गुलाम होता, मग या मराठवाडयाला इतिहासात काहीच स्थान नाही का? असा प्रश्न नव्या पिढीला पडण्याची शक्यता आहे. त्याचे उत्तर असं आहे, मराठवाडा हा प्रतिष्ठित राजवटींचा प्रदेश आहे. प्रतिष्ठानने आपली ख्याती जगभर नेली होती, देवगिरीचे यादव असेच पराक्रमी होते, सुस्थापित होते. मात्र अनेक शतकाच्या राजवटीनंतर शत्रूच्या दग्या फटक्याने ते पराभूत झाले आणि इतिहासाने त्यांच्या एकूणच राजवटीकडे प्रेरणेने पाहणे सोडून दिले. एवढाच काय तो त्यांचा दैवदुर्विलास म्हणता येईल. या सगळया पार्श्वभूमीवर मुक्तीसंग्राम समजून घ्यावा लागतो. तेव्हा तो नीट समजू शकतो.

या इतिहासात अनेक हुतात्मे होऊन गेले. त्या सर्वांच्या त्यागाचे पोवाडे कोणी गायले नाहीत. म्हणून त्यांचे शौर्य आणि त्यागाचे महत्व कमी होत नाही. अनेकांनी आपले घरदार नष्ट केले. त्याची कोणी नोंद केली नाही म्हणून त्यांच्या योगदानाचे महत्व कमी होत नाही. अशा सर्व पूर्वजांचे आपण या निमित्ताने स्मरण करुया. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया !

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे योगदान

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे योगदान
प्रा.डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे,
सहयोगी प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख 
श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी
मो. क्र. ९९२२७९४१६४

प्रस्तावना 
संत परंपरेतील क्रांतिकारक व केवळ संतच नाही तर राष्ट्रसंत या उपाधीस सार्थ करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. जेव्हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा चळवळीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रीय स्वरूपाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास लेखन आंशिकरित्या एकांगी राहील त्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा स्वातंत्र्य चळवळीविषयी असलेला संबंध संक्षिपाने घेण्याचा प्रस्तुत प्रयत्न या शोधनिबंधात करण्याचे योजले आहे.
जन्मापासूनच अवलिया असलेला माणिक हा विश्वाच्या कल्याणासाठीच होता. अधीच देश कार्यासाठी यावलीतील प्रत्येक कुटुंबात राष्ट्रभक्त निर्माण झालेले होते. शहिदांची यावली असे त्या जन्मभूमीस म्हटले जात असे. ब्रिटिशांची जुलमी राजवट होती. परकीय शत्रूबाबत भारतीय मनात विदर्भातील ग्रामीण जन- मनात क्रांतीचे पुल्लिंग राष्ट्रसंत यांनी पेटविण्याचे कार्य केले. कोणत्याही एकाच गावचा व घरचा नसलेला हा बालक बालपणीच बाहेर पडला. काही काळ त्यांनी रामटेक, चिमूर सारख्या अरण्य वेष्टित भागात योगसाधनेत व तपश्चर्येत घालविला. अडाणी व आदिवासी लोकांची सेवा करून देवबाबा या नावाने लोकांचे प्रेम त्यांनी संपादन केले. त्यातूनच त्यांच्या पुढील जीवनाची दिशा कार्याची रेखा विकसित होत गेली. १०४२ च्या महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यात एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून खेड्यापाड्यातील लोकांच्या मनात स्वराज्य विषयीचे अस्मितेचे बीज पेरण्याचे काम त्यांनी केले होते. "चिमूर परिसरात लोकांनी महाराजांना स्वदेशीचे व सुतकताईचे प्रयोग करताना पाहिले होते. सुत कताई करून महात्मा गांधीजींच्या पूर्वी महाराजांनी स्वयंप्रेरणेने तकलीतून स्वराज्याच्या पदचिन्हाची रुणझुण ऐकायला येणार याची बालवयातच जाणीव करून दिली होती"१. 
१०३० पासून भारताच्या इतिहासाची पृष्ठे निराळ्या तऱ्हेने रंगविली जाऊ लागली. तत्पूर्वी महाराजांनी मध्यप्रदेश व त्यांच्या बाहेरदेखील प्रवास केला. तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारत भ्रमण केले व आपल्या भजनांची छाप जनमनावर पाडली. मध्य प्रांत, वऱ्हाडच्या सुखवस्तू व विलास वृत्तीच्या बहुजन समाजाला तमाशासारख्या छंदाकंदातून 'लागू प्रभू छंद मनाला' अशी मधुर भजने ऐकून बाहेर आणले.२
तुकडोजींनी इ.स. १९२३ साली चिमूरला 'भजनी मंडळ' स्थापन करून पूर्वीच्या बाल समाजाला विशिष्ट रूप आणले. ही संघटनेची पूर्व चिन्हे होती. समान संघटना, सुत, चरखा, खादी यांचा संबंध लावून १९३० च्या चळवळीत धरपकडीत तुरुंगात जायची पाळीही महाराजांवर आलेली होती, पण ती टळली. महाराज जंगल सत्याग्रहात आपली भजने म्हणत. विशीच्या वयात महाराजांना तुरुंगात जाण्याची पाळी येणे, खादीवर जोर असणे आणि गुलामशाहीची चीड असलेली गीते जनमाणसात स्थान कमावून बसणे ही बाब त्यांच्यातील देशप्रेमाचेच द्वोतक होती. राष्ट्र उत्थानासाठी समाज सुधारणाही आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन अवलिया जीवन जगणारे राष्ट्रसंत आदर्श व टापटीपीचे जीवन ते जगू लागले.
भजनातून जनजागृती 
तुकडोजींनी प्रबोधनाचे व जनजागृतीचे माध्यम म्हणून भजने रचून ती धार्मिक माध्यमातून प्रभात फेऱ्या, वृत्तोत्सव, एक्के, सप्ते, चातुर्मास याद्वारे रूढ केली. त्यातून लोकसंग्रह घडवला ते जनसमुहाला अंतकरणाच्या ओलाव्याने अंतरिक तळमळीने महाराज सांगत महाराजांनी राष्ट्रीयता व बलसंपन्नता आधी विचार ग्रामीण जनतेला फार मोठ्या प्रमाणात दिले ते आखाडे कृषी प्रदर्शन शंकर पट भरवीत विविध कार्यक्रमातून राष्ट्रीय गीतांची पेरणी त्यांनी केली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीला गांधींनी शहरात पोहोचविले व शहरी लोकांना स्वातंत्र्याची भाषा शिकविली खेड्यातील लोकांना मराठी मुलखात तरी महाराजांनी स्वातंत्र्याच्या चळवळीची चळवळीचे पायाशुद्ध तत्त्वज्ञान सक्रियपणे दिले त्या तत्त्वज्ञानाची भाषा खेळताना गवसली नसेल पण चळवळीचा आत्मा मात्र त्यांच्या हाती गवसला गेला व हे महान कार्य महाराजांमुळे घडले.३
पराधीनतेचे दुःख
भारताच्या पराधीनतेचे दुःख महाराजांना बचत होते. पारतंत्र्याचे दुष्परिणाम व त्यामुळे होणारी जाचणूक, गांजणूक उघड्या डोळ्यांनी पहावी लागे. ती पाहून ते तळमळत होते. 'भारत ओस झाला असून असुराने करी धरला' (अनुभव सागर भजनावली पृ. २), 'असुरी राज्य गिळीले' (अनुभव सागर पृ. १५२) याची त्यांना तीव्र खंत वाटे. 'भरत भू दास्यात पडली', 'परवशता पुरी उलटली' व त्यामुळे 'गुलामगिरीच्या कर्कश बेड्या पायी करी पडल्या' आणि परवशतेच्या भरी भारतभू दुःखी जाहली'( पृ. १५० अनुभव सागर) हे त्यांना अगदीच असह्य होत होते.४
त्यांची कविता हे त्यांच्या कार्याचे साधन ठरत होती. तिच्यातील बोधामृतात राष्ट्रीयता घोळून निघत होती. मराठवाड्यातील निजामी राजवटीचाही उल्लेख त्यांच्या भजनातून ते देतात.'एक रावण निघून गेला असला तरी दुसरा झाला हा' (अनुभव सागर भजनावली पृ. १५१) परक्यांनी चहूबाजूनी देश दुर्बल केला व आमचे तन-मन धन धरून नेले. आम्हाला शरीरासकट परतंत्र केले व त्यामुळे बहुपंगू झालेल्या या भारतात स्वात्मता नच उरल्या' बद्दल दुःख होते. शब्दरचनेतही महाराज चतुर होते. दोन्हीकडून भारत नागवला जात असल्याचे त्यांनी 'द्विधा घसले' या शब्दरचनेतून सुचित केले. झोपडीचे का असेना पण स्वातंत्र्य हवे होते कसेही असले तरी आपले ते आपलेच. या भावनेने स्वराज्याच्या आगमनाबद्दल महाराज उत्सुक होते. गुलामगिरीच्या मोरापेक्षा हक्काचा कोंबडा बरा ही त्यांची धारणा होती. आपल्या भजनांच्या माध्यमातून पारतंत्र्यात असलेल्या तरुणांच्या मनात भारतीयांची प्राचीन आदर्श व मूल्य पेरून त्यांच्यात स्फूर्ती निर्माण केली. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी राष्ट्रसंतांची ही प्रचार पद्धती अविरत सुरू होती. प्राचीन आदर्शामधील वीर वृत्तीचे दाखले देण्यामध्ये त्यांनी औचित्य साधले. शौर्यधैर्याच्या कथा प्रभावी पद्धतीने भारावल्या भाषेत मांडण्याचे महाराजांचे कसब महाराजच जाणोत. गीतेतील दृष्टांत देत तरुणात वीर वृत्तीची जोपासना महाराजांनी केली. एकेकाळी गांजलेल्या मराठ्यांना महाराजांनी शिवछत्रपतीच्या विरोज्वल चारित्र्याची आठवण करून दिली व सांगितले की राष्ट्राचे दास्य नाशवा, मरणे जगणे दोन्ही सारखे आपणा' (अनुभव सागर पृष्ठ २२२) 
भारत हा संत महंतांचा, ऋषीमुनींचा पावन भूमी असलेला देश आहे. या राष्ट्राची समाजाची घडी नीट बसविण्यासाठी संत महांतांनी पुढे आले पाहिजे. त्यांनी मंदिरात केवळ घंटा न वाजविता व ध्वनी धतुरे न करता ते सोडून देऊन भारताची हाक ऐकायला सांगितले. 'भारताचे चालक व ईशाचे बालक तुम्हीच'. अशाप्रकारे देशात कुठेही गेले तरी महाराज लहान सहान संतापासून तर मोठ्या संतापर्यंत सर्वांना भेटून आपली विचारधारा हळूहळू सांगत व पटवून साधून त्यांना राष्ट्रप्रेमी बनवत.
स्वातंत्र्यपूर्व काळात नवयुवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा खटाटोप महाराजांनी केला. राष्ट्रसेवा साधण्यासाठी आंधळी भक्ती मागे टाकून कर्तव्य घोडा सावरावा व व्यसनांना आवरावे असा आवश्यक उपदेश त्यांनी केला. "मुखचंद्र सुखलेल्या हिंदू प्रभूच्या लेकरांना इतिहास पुरुषाचा ठसा याद करायला प्रवृत्त केले. भारताच्या गत वैभवाची जाणीव देऊन 'परदास्यी राहण्यापेक्षा मरण बरे' अशा स्थितीत जगवते तरी कसे? असा प्रश्न विचारला परक्या विरुद्ध बोलणे त्यावेळी महा दुस्कर असतानाही महाराजांनी ते केले. यातून त्यांचा बेडर राष्ट्रवाद निर्भय ध्येयवाद आढळतो.
"परकी सत्ता नष्ट होवो 
झळको स्वतंत्रतेचा दिवा" (अनुभव सागर पृ.१५२)
हे अंतरीचे बोल खोलून दाखवून 'अर्जुनासमवीर व्हा!'(अ. सा.११८), 'भारताचे ग्रहण नेत्री पाहू नका'(अ. सा.११९) 'समरी प्राण देऊन स्वातंत्र्य मिळवा व आपले काव्य बनवा' अशी भावी भारताच्या बाबतची इतिहास रेखा हिंदू लेकरासमोर चित्रित करून दाखविली आणि आपल्या सुख स्वातंत्र्याला जपायला कळकळीने सांगितले. आपल्या भजनाच्या काव्याच्या आधारे एकता संघटन समन्वयांवर भर दिला.
राष्ट्र जागवा
 राष्ट्र जागवा
 जागृत व्हा तरुणांनो 
वीरवृत्तीचा दिवा उजळवा l
 तसे नच झाले तर मरनेच बरे l
राष्ट्र जागविण्यासाठी महाराजांनी बाल, तरुण व स्त्रियांनाही चेतना दिली. क्रांती एका दिवसात होत नाही. त्यासाठी प्रचंड पूर्वतयारी हवी असते. तिच्या मुखाशी ज्वालांचा विस्फोट होण्यासाठी मानसिक, बौद्धिक पृष्ठभूमी बऱ्याच काळापूर्वी प्रयत्नपूर्वक तयार करावी लागते याची जाणीव महाराजांना होती. खेड्यापाड्यातून क्रांतीचे हे तत्त्वज्ञान कार्यरूप करण्यासाठी तुकडोजी महाराज अविरत, अविश्रांत, अथक प्रयत्नशील होते. विदर्भातील खेड्यापाड्यात ब्रिटिश सत्तेबाबत असंतोष निर्माण करण्याचे कार्यही महाराजांच्या प्रभातफेरीने केले. 'चल, उठ भारता आता ही वेळ नसे निजण्याची' ही गर्जना त्यावेळेच्या प्रभात फेरीतून महाराजांनी दिली.
शूरवीर तयार करणारे संतही या महाराष्ट्राच्या भूमीने दिले. समर्थ रामदास स्वामी व जगद्गुरु तुकोबाराय यांनी शिवरायांना त्याकाळी फार मोठे पाठबळ दिले. तीच परंपरा पुढे विदर्भाकडे आली विदर्भात संत निर्माण झाले. वैराग्यमूर्ती गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही दोन संत चंद्रसूर्याप्रमाणे सदैव तळपत राहतील व इतिहासात आठवणीत राहतील. मोझरी येथे स्थापन त्यांनी केलेले श्री गुरुदेव सेवाश्रम आजही राष्ट्रसेवेचे कार्य निरंतर करीत आहे. सालबर्डी येथे अभूतपूर्व यज्ञ महाराजांनी घडविला. लाखो लोकांचे संघटन घडून आणले. ही ऐतिहासिक घटना घडली. या जनसमुदायामुळेच पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची भेट घडली. महाराजांचे प्रस्थ वाढले. जनता जागृत करण्यासाठी विदर्भात कोणी महाराज जेवन देतो अशी चुकीची माहिती गांधीजींना तरी दिली. गांधीजींनी महाराजांना भेटण्यासाठी चिठ्ठी पाठविली. वर्धा येथील सेवाग्राममध्ये महात्मा गांधीजीचे मौन केवळ महाराजांच्या भजनाने तुटले. एवढी ताकद महाराजांच्या भजनात होती.
 'किस्मत से राम मिला जिसको जिसने ये तीन जगा पायी' या भावपूर्ण भजनाने बापूचे भान हरपून गेले और गावो म्हणून बापूचे मौन सुटले. आप देश के लिए कुछ किजीये असे महात्मा गांधींनी महाराजांना सांगितले. चातुर्मास, सप्ते, एक्के यातून राष्ट्रीय चळवळ महाराजांनी उभी केली. महाराजांच्या आष्टी येथील भजनाने परकीय सत्तेबाबत जनमत तयार झाले.
"झाड जुडेले बंब बनेंगे 
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे 
भक्त बनेगी सेना नाव लगेगी किनारे 
अब काय कोई धूम मचाते हो आते है नाथ हमारे" 
आष्टी, चिमूर, बेनोडा येथील सत्याग्रह महाराजांच्या कार्याने व भजनाने घडविला. ब्रिटिशांनीही त्यांचा धसका घेतला. महाराजांच्या भजनाने इतिहास घडविला. असा एकमेव संत महाराष्ट्रात निर्माण झाला की जो देशासाठी कारागृहात गेला. देश स्वतंत्र झाल्यावरही राष्ट्रीय कार्य त्यांनी सोडले नाही. "अब तो स्वराज्य आया है अपना गाव सुंदर बनाओ" स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी महाराजांची खंजेरी गावोगाव गर्जू लागली. त्यांनीं विश्वशांती नामसप्ताह संपन्न केला. 'गुरुदेव' मासिक सुरू केले. सामुदायिक प्रार्थनेस बैठक प्राप्त करून दिली. यातून एक संस्था अखिल भारतीय गुरुदेव सेवाश्रम' मोझरी येथे उदयास आले.
"भगवी टोपी शांती सुखाची
 शुभ्र खादीची सदभावाची
 मस्तकी टिळक तो प्रेमाचा 
साधी राहणे उच्च विचारसरणी तुकडोजींची छटा"
साने गुरुजींनी स्वातंत्र्यानंतर पंढरपूरचे मंदिर हरिजनांसाठी खुले नव्हते म्हणून आंदोलन सुरू केले. त्यावेळी साने गुरुजींना त्यांच्या उपोषणाला पहिला पाठिंबा तुकडोजी महाराजांनी दिला. महाराजांनी मदत केली. 
महाराजांची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद महाराजांच्या भेटीसाठी मोझरीस आले. महाराजांनाही राष्ट्रपती भवनात निमंत्रण देण्यात आले राष्ट्रपती भवनात महाराजांची खंजरी निनादली. राष्ट्रसंत पदवी त्यांच्या कार्यामुळेच डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना दिली. ग्राम सुधारणेचा कार्यक्रमातही लालबहादूर शास्त्री गुलजारी नंदा यांनीही मोझरीला भेटी दिल्या. महाराजांची शिस्त पाहून ते दंग झाले. इ.स. १०५४ साली विदर्भ साहित्य मेळावा गुरुकुंज येथे घेण्यात आला. त्यामध्ये महाराजांची 'ग्रामगीता' प्रकाशित केल्या गेली. या नाविन्यपूर्ण ग्रंथामुळे अनेक खेडे सुधारले. माणसे दुरुस्त व्हायला लागली. ग्रामगीतेच्या आधारे हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, पाटोदा आदी गावे आदर्श गावे म्हणून जगाच्या नकाशावर आली. तुकडोजी महाराज गावोगाव नशाबंदी, बलिदान बंदी, आखाडा संघटन गोवंश बंदी करण्यासाठी फिरले. भूदान यज्ञ चळवळीतही महत्त्वाचे योगदान महाराजांनी दिले. वर्धा जिल्ह्यात पवनार आश्रम आहे. संत विनोबा भावेंनी भूदान यज्ञ घडविला व या कामे महाराजांनी त्यांना मोलाची मदत केली. महाराज या कामासाठी अकरा दिवस फिरले. महाराजांना अकरा हजार एकर जमीन लोकांनी दिली. ती विनोबांना महाराजांनी दिली. इस १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले; तेव्हा महाराजांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. भारताच्या सैन्यास प्रेरणा देण्यास महाराज सीमेवर धावले. त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते. तेही महाराजासमवेत होते. स्वस्थ बसलेल्या भारतीय तरुणांना ते म्हणतात, "अग्नी भडकला युद्धाचा 
तू स्वस्थ होऊन बसे
 रक्त न उसळे तुझे तरुण म्हणावे कसे?"
 दिलबर के लिए दिलदार है 
हम दुश्मन के लिए तलवार है हम 
सैन्यात चैतन्य महाराजांच्या भजनाने निर्माण केले. असा संत की जो देशाच्या रक्षणासाठी रणांगणावर गेला. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी महाराजांचे कार्य लक्षात घेता मोझरीला आल्या. थोर पत्रकार आचार्य अत्रे महाराजांच्या भेटीला येत असत. स्वामी विवेकानंद पहिल्या विश्वधर्म परिषदेसाठी शिकागोला गेले; परंतु दुसरी परिषद जेव्हा जापान येथे भरली तेव्हा भारताचे नेतृत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले. मलया, ब्रह्मदेश व जापान या देशांचा दौरा महाराजांनी केला. महाराज अनेक संस्थांशी संबंधित होते. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेली संस्था ही लोकांसाठी उभारली. संचालक मंडळ त्यांनी निर्माण केले. या संताने मानवतेचे मंदिर बांधले व इतर मंदिर त्यांची आवश्यकता लक्षात घेता बांधली. आयुर्वेद महाविद्यालय, शाळा, डी.एड., बी.एड. तसेच आयुर्वेद रसशाळा त्यांनी स्थापन केली. या सर्वांपासून महाराज अलिप्त राहिले व जनसेवेकडे लक्ष त्यांनी पुरविले. मराठी व हिंदी वाड्मयाच्या इतिहासालाही त्यांच्या वाडमयीन कार्याची दखल घ्यावीच लागते. इयत्ता चार वर्ग शिकलेला हा संत त्याने मराठी व हिंदी साहित्यात उत्कृष्ट व चौफेर लेखन केले. हे वाङ्मय करोडोच्या मुखी जाण्यासाठी आजही गुरुदेव सेवा मंडळाच्या हजारो शाखा कार्यरत आहेत. 
महाराजांच्या वाङ्मयातून देशनिष्ठा, देशभक्ती, देशप्रेम ओतप्रोत पहावयास मिळते.
राष्ट्रीय जागृती हा त्यांच्या जीवनाचा प्रमुख उद्देश होता. राष्ट्रसेवा हा त्यांचा जीवन मार्ग होता. राष्ट्रीय स्वातंत्र्य हा त्यांचा जीवन निर्णय होता, तर राष्ट्रप्रेम हा त्यांचा जीवनक्रम होता. महाराज पारतंत्र्य व स्वातंत्र्य या दोन्ही काळात असल्यामुळे भारत देशाची दोन्ही काळातील अवस्था त्यांनी अनुभवलेली होती. त्यांनी रचलेली मराठी राष्ट्रीय भजनावलतील भजने राष्ट्रगीते आजही भारतातील बंधू भगिनींना राष्ट्रसेवेची वेळोवेळी स्फूर्ती व प्रेरणा देत आहेत. राष्ट्रीय भजनावलीत एकूण ९१ भजने आहेत. महाराजांची असंख्य हिंदी पद रचनाही राष्ट्रभक्तीपर आहे.
 महाराजांनी ग्रामन्नोतीच्या दिव्याबरोबरच वीर वृत्तीचा दिवा उजळण्यास भजनाद्वारे प्रोत्साहित केले आहे. संतांनी या देशातील क्षात्रवृत्ती क्षण केली अशी टीका केली जाते. या टिकेस महाराजांची राष्ट्रीय भजने उत्तर आहेत. 
या भारतात बंधुभाव नित्य वसु दे
 दे वरची असा दे 
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे 
मतभेद नसू दे 
दे वरची असा दे 
हे महाराजांचे देशभक्तीपर गीत स्वातंत्र्योत्तर काळात खूपच लोकप्रिय झाले. शालेय क्रमिक पुस्तकात व विद्यापीठ अभ्यासक्रमात व नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे विद्यापीठ गीत म्हणूनही ते मान्यता पावलेले आहे. 
भारताच्या सुपुत्रांनो उठा 
घ्या राज्य आपुल्या हाती
 भाग्य उदयास आलेले वाढू द्या अंगीच्या रक्ता 
स्वातंत्र्यदेवता आली भारतात सुख द्यायला 
प्यारा हिंदुस्तान है l गोपालो की शान हैl हिंद सदा के लिए आझाद रहेगा l 
जुग जुग जियेगा l
उठा श्रीमंतांनो! अधिकाऱ्यांनो! पंडितांनों सुशिक्षितांनों !साधूजणांनों!
 हाक आणि क्रांतीची! 
अशी कितीतरी क्रांतिकारी देशभक्तीची गीते, भजने अभंग महाराजांची आहेत.
ती भारतीयांच्या मनामनात राष्ट्र प्रेरणा, राष्ट्रभावना जागृत ठेवतात.

संदर्भ ग्रंथ
१. भाऊ मांडवकर, राष्ट्रसंत तुकडोजी आणि स्वातंत्र्याची चळवळ, पान १२
२. उनि, पान १२
३.उनि, पान १६,१७
४. अनुभव सागर भजनावली
५. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन पाचवे स्मरणिका
६. डॉ. बाळासाहेब जाधव व प्रा. प्रल्हाद भोपे (संपादक) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: व्यक्ती आणि वाड्मय
७. राष्ट्रसंत तुकडोजींचा पोवाडा.



वर्णनात्मक व समाजभाषाविज्ञान

वर्णनात्मक व समाजभाषाविज्ञान

अभ्यासपत्रिकेची उद्दिष्टे

१. भाषाविज्ञानाची संकल्पना समजून घेता येईल.

२. वर्णनात्मक व समाज भाषा विज्ञानाचा परिचय होईल.

३. स्वानिमविचार समजून घेता येईल.

४. रूपविचार समजून घेता येईल.

५. वाक्यविचाराचे स्वरूप समजून घेता येईल.

६. अर्थविचाराचे स्वरूप समजावून घेता येईल.

७. वर्णनात्मक व समाजभाषा विज्ञानाचे महत्त्व लक्षात येईल.

८. भाषेच्या अंत:सूत्राचा अभ्यास होईल.


भाषाविज्ञान : संकल्पना

मानवी भाषेविषयीची एक नवी जाणीव विसाव्या शतकात निर्माण झालेली आहे हे खरे; परंतु यापूर्वी भाषेविषयी विचार किंवा त्याचा अभ्यास होत नव्हता असे मात्र नव्हे. भाषा हा मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मानवी जीवनामध्ये पायाभूत असणारा जो संपर्क व्यवहार आहे त्याचे प्रमुख माध्यम भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये भाषेचा उगम तिचे स्वरूपाविषयी काही कल्पना, संकेत, जाणिवा, रूढ असणे अपरिहार्य आहे. भाषांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करताना श्रेष्ठ-कनिष्ठ, तर्कशुद्ध- तर्कदृष्ट, विशुद्ध- अपभ्रष्ट इत्यादी ढोबळ मूल्यमापनात्मक कल्पना बाजूला साराव्या लागतात. भाषा विज्ञानामध्ये अशा नियमक अथवा आदेशात्मक दृष्टिकोनाला स्थान नाही भाषेचा प्रत्येक नमुना भाषा वैज्ञानिकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. एक नमुन्याचे म्हणजेच भाषा प्रत्यक्षात कशी वापरली जाते याची वस्तुनिष्ठ पद्धतीने काटेकोर वर्णन देणे हे त्याचे कार्य असते. एकूण भाषिक व्यापाराचा विचार केल्यास नेहमीच्या व्यवहारातील बोली व मौखिक नमुन्यांना केंद्रवर्ती स्थान मिळणे अपरिहार्य आहे. आधुनिक भाषाविज्ञानाचा अभ्यास मूल्यमापनात्मक कल्पनावर आधारलेला नाही. भाषा प्रत्यक्षात कशी वापरली जाते याचे तटस्थपणे वस्तुनिष्ठपणे इतर भाषांची चष्मे न वापरता पूर्वग्रहविरहित वर्णन करणे हे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे.


भाषेचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या ज्ञान शाखेला भाषाविज्ञान (Linguistics) असे म्हणतात. भाषाविज्ञानात भाषाच्या घटकांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक भाषा ही व्यामिश्र स्वरूपाच्या ज्ञानाने आणि क्षमताने घडलेली असते. भाषेमागील व्यामिश्र स्वरूपाचे ज्ञान मिळवणे, भाषेच्या क्षमतांचा शोध घेणे म्हणजे भाषा वैज्ञानिक अभ्यास करणे होय. भाषाविज्ञानात भाषा म्हणजे काय? भाषेचे गुणधर्म कोणते? भाषेची संरचना कशी असते? भाषा कशी आत्मसात केली जाते? भाषानिर्मिती व भाषा आकलण्यात बोधन पातळीवर घडणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप कोणते? संदेश निर्मितीसाठी भाषेचा उपयोग कसा केला जातो? भाषा कशा बदलतात? भाषा-भाषा मध्ये समान काय असते? असे विविध प्रश्न उद्भवत असतात. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भाषेबाबतची ज्ञानशाखा कार्य करते. भाषा व्यवहाराचे निरीक्षण करणे, त्यांचे विश्लेषण करणे त्यावरून काही सिद्धांत मांडणे, नियम- तत्व शोधून काढणे हे भाषाविज्ञानात घडत असते. थोडक्यात भाषाविज्ञान म्हणजे भाषेचा सर्वांकष व दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होय. भाषाविज्ञानाचे क्षेत्र अनेक वैज्ञानिकांनी मोठे केले. त्यात सोस्यूर(Saussure), ब्लूमफिल्ड (Blumfield), बोआस (Boas),सपीर (Sapir), हॉकेट(Hocket),  चॉम्स्की (Chomsky) अशा अनेक वैज्ञानिकांचा उल्लेख करावा लागेल. ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या दोन अभ्यास परंपरा आपल्याला दिसतात.

भाषाविज्ञान : व्याख्या - भाषेचा वैज्ञानिक दृष्टीने केलेला अभ्यास म्हणजे भाषा विज्ञान होय. भाषा हा भाषा विज्ञानाच्या अभ्यासाचा विषय आहे. अशोक केळकर यांनी भाषा विज्ञानाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. "भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणारी जी एक नवीन ज्ञान शाखा सोस्यूर, ब्ल्यूमफिल्ड इत्यादींच्यामुळे प्रस्थापित झाली ती लिंग्विस्टिक्स किंवा भाषाविज्ञान." या भाषाविज्ञानाविषयी काही गैरसमज प्रचलित होते. भाषाविज्ञान म्हणजे व्याकरण, भाषाविज्ञान म्हणजे साहित्याचा अभ्यास. भाषा विज्ञान म्हणजे लिखित भाषेचा अभ्यास इत्यादी. आता असे गैरसमज फारसे आढळत नाहीत. तरी मित्रांनो, व्याकरण म्हणजे भाषाविज्ञान नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. व्याकरण हा भाषा विज्ञानाचा एक भाग ठरतो. भाषाविज्ञान हे व्याकरणापेक्षा अधिक व्यापक क्षेत्र होय. भाषाविज्ञानात केल्या जाणारा भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ लिखित भाषेचा अभ्यास नव्हे. भाषेच्या बोली रूपाचा अभ्यास करणे हे देखील भाषाविज्ञानात महत्त्वाचे मानले जाते. तेव्हा भाषाविज्ञान म्हणजे लिखित व औपचारिक भाषेच्या अभ्यासाचे विज्ञान म्हणायला हवे. भाषाविज्ञान म्हणजे साहित्याचा अभ्यास असा समज रुढ होण्यासाठी भाषेचा वापर साहित्याच्या क्षेत्रात होतो हे एक कारण होते. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रात भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपापैकी एक ठरते. साहित्यापलीकडे भाषेची जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतो. त्याचप्रमाणे जात, व्यवसाय, लिंग यानुसार होणाऱ्या भाषेतील बदलांचा म्हणजेच भाषा भेदांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. थोडक्यात, भाषाविज्ञान हे एक प्रकारे व्यापक अभ्यास क्षेत्र आहे. ध्वनींच्या निर्मितीपासून तर भाषा भेदापर्यंत भाषेची वेगवेगळी अंगे भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतात.

भाषाविज्ञानाचे स्वरूप - 

मित्रांनो, भाषाविज्ञानात भाषेचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या अभ्यासाचे स्वरूप वर्णनात्मक, ऐतिहासिक तौलनिक, उपयोजित असे आढळून येईल. आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या वर्तमानकालीन रूपाला महत्त्व देते.  यात भाषेच्या औच्चारिक नमुन्यांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर आधुनिक भाषाविज्ञान भाषा ही एक संरचना आहे असे म्हणून भाषेचा वस्तुनिष्ठ अभ्यास करते. भाषेच्या संरचनेमागील नियमव्यवस्था, तत्वे शोधून काढण्याचे काम भाषाविज्ञानात सुरू असते. थोडक्यात, भाषेमागील रचनाविज्ञान स्पष्ट करण्याचे काम आधुनिक भाषाविज्ञानात सुरू असते.

भाषेच्या इतिहासाचा अभ्यासही भाषा विज्ञानाच्या कक्षेत येतो. तो ऐतिहासिक लिखित भाषिक रूपांचा असतो. असा अभ्यास करताना भाषाभाषांमधील तुलनेचा उपयोग करण्यात येतो. यातून भाषेच्या परिवर्तनाविषयी सिद्धांत मांडले जातात. ग्रीमचा सिद्धांत, व्हेरनरचा सिद्धांत ऐतिहासिक भाषा विज्ञानात प्रसिद्धच आहे.  तौलनिक दृष्टिकोनातून भाषेच्या परिवर्तनाचा जसा मागोवा घेण्यात येतो, तसेच भाषाभाषांमधील साम्य-भेद शोधून त्यांच्या साह्याने भाषांचे कुलनिष्ठ वर्गीकरण केले जाते.


अलीकडच्या काळात आधुनिक मानव्यविद्या समाजविज्ञान किंवा अन्य शाखामधील विषयाच्या सहाय्याने भाषाभ्यासातील नवे दृष्टिकोन विकसित झालेले आहेत. भाषाविज्ञानाच्या विविध जोड शाखा आता दिसतात. त्यातून भाषा विज्ञानाचा अभ्यास विविधांगी झालेला आहे.

भाषेचा वापर जीवनाच्या विविध क्षेत्रात सुरू असतो. व्यावहारिक क्षेत्रातील भाषेच्या वेगवेगळ्या गरजांसाठी भाषा विज्ञानाच्या साह्याने सामग्री पुरविणे, त्यासाठी भाषिक कौशल्य प्रदान करणे हे देखील भाषा विज्ञानाचे क्षेत्र आहे.


भाषा आणि साहित्य यांचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे भाषाविज्ञानाचे केवळ भाषेचा अभ्यास करून चालत नाही. भाषा विज्ञानाच्या सहाय्याने साहित्याच्या भाषिक विश्लेषणाला चालना देणे, त्यासाठी आवश्यक संकल्पनात्मक चौकट आणि विश्लेषण पद्धती साहित्याला पुरविणे यांचीही आवश्यकता भासते. थोडक्यात, भाषा विज्ञानात मानवी जीवनातील भाषेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. भाषेच्या सर्वांगीण अभ्यासाला भाषाविज्ञानात चालना मिळालेली दिसते. आज भाषाविज्ञानातील अभ्यास केवळ भाषेच्या प्रांतापुरता मर्यादित राहिलेला दिसत नाही तर त्याचा विस्तार अन्य ज्ञानक्षेत्रातील विषयाच्या सहाय्याने व्यापक झालेला आहे.

भाषाविज्ञान : उदय आणि विकास

मानवी भाषेचा स्वतंत्रपणे विचार करणारी ज्ञान शाखा म्हणून भाषाविज्ञानाचा जन्म अलीकडचा असला तरी व्याकरण, व्युत्पत्ती इत्यादी भाषेच्या विशिष्ट अंगांचा पद्धतीशी विचार प्राचीन काळापासून झालेला दिसतो. भारतीय, ग्रीक, चिनी, अरबी संस्कृतीतून भाषा विचाराची परंपरा प्राचीन काळी आढळते. भारतामध्ये वैदिक कालखंडापासून भाषा विचार दिसतो. प्रतिशाखांमध्ये वेदांमधील ध्वनी उच्चारांचा विचार झालेला आहे. शिक्षा ग्रंथात ध्वनींचे उच्चारण आणि वर्गीकरण, आघात, संधी इत्यादीचा विचार आढळतो. ब्राह्मणके, अरण्यके, उपनिषदे या ग्रंथातून तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने विचार झालेला दिसतो. इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात पाणिनीने लिहिलेल्या 'आष्टाध्यायी' या ग्रंथात संस्कृत भाषेच्या व्याकरणाची मांडणी झालेली आहे. प्राकृत भाषांच्या व्याकरणाचाही विचार झालेला दिसतो. पश्चिमेकडे प्राचीन ग्रीकांनी भाषा विश्लेषण केले. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांनी उच्चारण प्रक्रिया, लिंगविचार इत्यादी संबंधित विवेचन कधी व्याकरणाच्या अंगाने तर कधी काव्यशास्त्राच्या अंगाने केलेले आहे. लॅटिनची व्याकरणे रचल्या गेली.  प्रबोधन काळात युरोपीय लोक व्यापारांच्या, धर्मप्रसाराच्या निमित्ताने देशोदेशी फिरू लागले. या काळात त्यांनी जगातल्या भाषांची अनुकरणात्मक व्याकरणे तयार केली. मध्ययुगातील भाषा विचाराला अनेक बाबतीत मर्यादा प्राप्त झालेल्या होत्या. 


अठराव्या शतकात पाश्चात्य भाषाभ्यासाला एक नवी दिशा प्राप्त झाली. विल्यम जोन्स (१७४६ - १७९४) या ब्रिटिश अधिकाऱ्याने/ अभ्यासकाराने संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या भाषांमध्ये कमालीचे साम्य असून त्या एकाच भाषेपासून उद्भवल्या असाव्यात असा विचार प्रथम मांडला होता. या गृहीतकाचा शोध घ्यायचा तर त्यासाठी भाषांचे तथ्यनिष्ठ ऐतिहासिक संशोधन होणे आणि त्याला भाषांच्या तुलनात्मक अभ्यासाची जोड मिळणे आवश्यक होते. या गरजेतून ऐतिहासिक आणि तौलनिक भाषाविज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली.

ऐतिहासिक भाषा विज्ञानात भाषांमध्ये कालक्रमाने घडत गेलेल्या परिवर्तनाचा अभ्यास करण्यात आला. ऐतिहासिक अभ्यासाला भाषाभाषांची तुलनात्मक अभ्यासाची जोड देण्यात आली. त्यामुळे ऐतिहासिक आणि तौलनिक भाषा विज्ञानाची पद्धती आकाराला आली. सुरुवातीला ही शाखा कम्पेरेटिव्ह फिनोलॉजी या नावाने ओळखली जायची. नंतर भाषाविज्ञान हे स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. फिलोलॉजीची उपशाखा नाही हे माहीत झाल्यावर हे नाव मागे पडले. ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अभ्यासातून भाषाकुले निश्चित करण्यात आली. ग्रीम (१७८५- १८६३) यांनी ध्वनी परिवर्तनाचे नियम शोधून काढले.

व्हेरनर(१८४६-१८९६),  यांनी ध्वनी परिवर्तनाचे नियम शोधून काढले. अशा रितीने ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा विकास होत राहिला. फ्रांझ, बॉप, श्लेगेल, रास्क, व्हिटनी, मॅक्समुल्लर बुगमान, कोल्डवेल, ग्रिअर्सन, ग्रासमन हे या परंपरेतील महत्त्वाचे अभ्यासक. पुढे भाषेच्या ऐतिहासिक पद्धतीने केलेल्या अभ्यासाची लोकप्रियता आणि प्रभाव इतका वाढला की, हर्मान पॉल सारख्या वैज्ञानिकाला असे वाटू लागले की, ऐतिहासिक भाषा विज्ञानाशिवाय भाषा विज्ञानात दुसरे काही असू शकत नाही. विसाव्या शतकाच्या आरंभी या भाषा वैज्ञानिकाने मांडलेल्या विचारांमुळे भाषा विज्ञानातील अभ्यासाची दिशा बदलून गेली. ऐतिहासिक दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या अभ्यासातील मर्यादा पुढे आल्या व हा अभ्यास मागे पडत गेला. सोस्यूरच्या विवेचनातून वर्णनात्मक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास रूढ झाला. वर्णनात्मक भाषा विज्ञानाला आधुनिक भाषाविज्ञान म्हटल्या जाते. वर्णनात्मक भाषा विज्ञानाची मुहूर्तमेढ फर्दिना द सोस्यूर या फ्रेंच स्वीस विद्वानाच्या विचारातून झाली. सोस्यूरने इतिहास निरपेक्ष भाषाविश्लेषण ही भाषा विज्ञानाची कोनशिला आहे असे मत मांडले. कोणतीही भाषा ही स्वयंस्पष्ट असते असे सांगून भाषा ही एक रचना आहे. भाषा ही चिन्हव्यवस्था आहे. भाषा ही सामाजिक संस्था आहे इत्यादी विचार मांडून भाषेच्या रचनाधीष्टतेकडे लक्ष वेधले. भाषा आणि भाषण यातील भेद मांडून भाषण म्हणजे औच्चारिक भाषेच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त करून दिले. भाषेच्या वर्तमानकालीन रूपांचा, त्यामागील व्यवस्थेचा अभ्यास महत्त्वाचा ठरू लागला अशा रीतीने भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाला चालना मिळाली. ब्लूमफिल्ड, चॉम्सकी इत्यादी भाषा वैज्ञानिकांनी हे क्षेत्र पुढे नेले. प्राग प्रणाली/ संप्रदाय अमेरिकन संरचनावादी संप्रदाय, ब्रिटिश संरचनावादी संप्रदाय डॅनिश संरचनावादी संप्रदाय इत्यादी वेगवेगळे संप्रदाय वर्णनात्मक भाषा विज्ञानात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ठरले.

थोडक्यात, भाषाविज्ञानाचा प्रारंभ अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दिसून येतो. एकोणिसाव्या शतकात भाषाविज्ञान खऱ्या अर्थाने भरात आलेले होते. या टप्प्यावर ऐतिहासिक, तौलनिक भाषाविज्ञान विकसित झाले. भाषाविज्ञानातील या दृष्टीकोनात विसाव्या शतकात बदल होऊन आधुनिक भाषाविज्ञानाचा प्रारंभ झाला. आधुनिक भाषाविज्ञानात वर्णनात्मक भाषाविज्ञानाचा पाया रचला गेला. आज भाषा विज्ञानाचा अनेक अंगाने विस्तार झालेला दिसून येतो.


वर्णनात्मक : भाषाविज्ञानाचे स्वरूप

वर्णनात्मक भाषा विज्ञान ही शाखा विसाव्या शतकाच्या आरंभी उदयाला आली. १९२० नंतर भाषा अभ्यास क्षेत्रावर या शाखेचा एवढा प्रभाव पडला की त्यामुळे १९ व्या शतकात प्रभावी ठरलेल्या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे महत्त्व कमी होऊ लागले.  इतकेच नव्हे तर ऐतिहासिक अभ्यासाच्या वैज्ञानिकतेबद्दल शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. अतिशय थोड्या कालावधीत वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा ज्ञान क्षेत्रात दबदबा निर्माण होण्याचे कारण म्हणजे या अभ्यास पद्धतीला असलेला वैज्ञानिक पाया आणि या पद्धतीतील काटेकोरपणा होय.

वर्णनात्मक भाषाविज्ञानाला आधुनिक भाषाविज्ञान असेही म्हटले जाते. वर्णनात्मक अभ्यास पद्धतीची सुरुवात फर्दिना द सोस्यूर यांनी केली. बोलल्या जाणारी भाषा वर्णनात्मक भाषा विज्ञानात केंद्रस्थानी असते. या पद्धतीत भाषेच्या औपचारिक नमुन्यांचा अभ्यास करून भाषाविषयक निरीक्षणे नोंदविल्या जातात. औपचारिक नमुन्यातील व्यक्तीस अपेक्ष गुणधर्म बाजूला काढून भाषेची स्वनव्यवस्था, पदव्यवस्था व वाक्यव्यवस्था यांचे परस्पर संबंध शोधले जातात. स्वनविज्ञान(Phonetics), स्वनिम विचार(Phonology), रुपिमविचार(Morphology), वाक्यविचार(Synetex), अर्थविचार (Semantics) इत्यादी वर्णनात्मक भाषाविज्ञानातील गाभाशाखा होत.



वर्णनात्मक भाषा विज्ञानात भाषेच्या वर्तमानातील रूपाचा अभ्यास होतो. या अभ्यास पद्धतीमध्ये एककालिक आणि कालक्रमिक भाषिक स्थितीचे विश्लेषण केले जाते. या पद्धतीमध्ये कोणताही एक कालबिंदू निश्चित करून त्या ठिकाणच्या भाषेच्या स्थितीचे वर्णन केले जाते. भाषेचा एका विशिष्ट टप्प्यावरील रूपाचा अभ्यास करून भाषेच्या रचनातत्वावर वर्णनात्मक भाषा विज्ञान प्रकाश टाकते. हा अभ्यास एककालिक असतो. पुढील उपशाखातून वर्णनात्मक भाषाविज्ञानातून अभ्यास चाललेला असतो.

वर्णनात्मक भाषाविज्ञानाची व्याप्ती


स्वनविचार (Phonetics) - मानवी मुखावाटे निर्माण होणाऱ्या ध्वनींचा (स्वनांचा) भाषानिरपेक्ष दृष्टिकोनातून केलेला अभ्यास.

स्वानिमविचार (Phonology/Pgonemics) - मानवी मुखावाटे निर्माण होणाऱ्या व भाषेत स्थान असलेल्या ध्वनींचा म्हणजेच स्वनांचा भाषासापेक्ष अभ्यास.

रुपिमविचार (Morphology) - शब्दांच्या रचनांचा अभ्यास.

वाक्यविचार (Syntax) - वाक्यरचनांचा अभ्यास

अर्थविचार (Semantics) - अर्थप्रक्रियेचा अभ्यास

वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये अभ्यासकाचे काही संप्रदाय आहेत. भाषेतील घटकांचा त्यांच्या कार्यावरून अभ्यास करणारा प्राग संप्रदाय, भाषिक नमुन्यांचा तार्किक पद्धतीने विचार करणारा कोपनहेगन संप्रदाय आणि औपचारिक नमुन्यांचा अभ्यास करून भाषिक संरचनांचा शोध घेणारा अमेरिकन संरचनावादी संप्रदाय हे यातील काही महत्त्वाचे संप्रदाय होत.  यापैकी अमेरिकन संरचनावाद्यांचा विशेष बोलबाला झालेला आहे.


वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा विकास

  विसाव्या शतकाच्या आरंभी भाषाभ्यासात अमुलाग्र बदल झाले. ऐतिहासिक भाषा अभ्यासाची जागा वर्णनात्मक अभ्यासाने घेतली. लिंग्विस्टिक्स हा शब्द या नव्या शाखेला लावण्यात येऊ लागला. या परिवर्तनाचे श्रेय सोस्यूर या स्वीस भाषा वैज्ञानिकाला जाते. त्याचे Course de linguistique generale हे पुस्तक १९१६ साली प्रसिद्ध झाले आणि भाषाविज्ञानात नवे युग अवतरले.

सोस्यूरने ऐतिहासिक आणि वर्णनात्मक भाषाविज्ञानातील फरक प्रथमच स्पष्टपणे दाखवून दिला. सोस्यूरने भाषेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. भाषेचा अभ्यास केवळ इतिहासाचा म्हणजे कालक्रमिक दृष्टिकोनातून न करता विशिष्ट काळी, विशिष्ट प्रदेशात तिचे जे स्थिर रूप उपलब्ध असते ते स्पष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत हे सोस्यूरने सांगितले. त्यासाठी भाषा व्यवहाराची मदत घेतली पाहिजे. भाषा व्यवहारामागील सर्व भाषकांना समान अशी जी भाषाव्यवस्था, तिचे वर्णन करणे हे भाषाभ्यासाचे उद्दिष्ट असले पाहिजे हे त्याने स्पष्ट केले. भाषा हे ध्वनीरूप घटकांनी साकार होणारे एक चिन्हव्यवस्था असून तिच्यातील चिन्हे ही पूर्णतः यादृच्छिक स्वरूपाची आहेत इत्यादी नाविन्यपूर्ण विचार सोस्यूरने मांडले. त्यांच्या विचाराच्या प्रकाशात आधुनिक अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आणि वर्णनात्मक भाषा विज्ञान विकसित होत गेले. 

१९३० ते १९४० या दरम्यान भाषांच्या दोन्ही विचारावर काम झाले. १९४० ते १९५० पर्यंत पदविचारावर काम झाले. १९५० नंतर वाक्यविचाराकडे लक्ष वेधले गेले. प्रथमोस्थित संघटक पद्धतीने वाक्याचे विश्लेषण करून त्यांच्या रचनावर प्रकाश टाकला जाऊ लागला. वाक्यविचारानंतर अर्थविचाराचा विकास झाला.

आज वर्णनात्मक भाषा विज्ञानात विविध संप्रदाय निर्माण झालेले आहेत. प्राग संप्रदाय, कोपेनहेगेन संप्रदाय, अमेरिकन संप्रदाय इत्यादी. या सर्वांमध्ये प्रभावी ठरलेली अभ्यास शाखा म्हणजे संरचनावादी शाखा ही शाखा अमेरिकेत प्रथम उदयाला आली. प्रसिद्ध भाषा वैज्ञानिक ब्लूमफिल्ड हा तिचा प्रणेता होता. त्याचे १९३३ साली प्रसिद्ध झालेले Language हे पुस्तक या संप्रदायास दिशा देणारे ठरले.

आधुनिक भाषाविज्ञान म्हणजे संरचनावादी भाषा विज्ञान असेच समीकरण या काळात रूढ झाले. ब्लूमफिल्ड हा वर्तनवादी मनोविज्ञानाचा अभ्यासक होता. भाषा ही एक प्रकारचे वर्तनच असून तिचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो असे ब्लूमफिल्डचे मत होते. भाषेची व्यवस्था अनेक घटउपघटकांच्या भिन्न भिन्न स्तरावरील संरचनांनी बनलेली असते असे मानून संरचनावाद्यांनी तिच्या संरचना स्पष्ट करण्यासाठी विशिष्ट वर्णन पद्धतीचा अवलंब केला. भाषा ही भौतिक घटना असून तिचे विश्लेषण, वर्गीकरण इत्यादी प्रकारांनी अभ्यास करता येतो असा त्यांचा विश्वास होता. प्रत्यक्ष भाषण व्यवहाराचे नमुने गोळा करून त्यांचे विश्लेषण करून प्रथम त्या भाषेची स्वानिम व्यवस्था निश्चित करता यायची. त्यानंतर त्या भाषेचे लघुत्तम सार्थ घटक किंवा रुपिम निश्चित करून त्यांच्या लहान मोठ्या रूपबंधाद्वारे त्या भाषेचे व्याकरण स्पष्ट करायचे असे एक तंत्र त्यांनी विकसित केले. या तंत्राचा उपयोग करून जगातल्या कुठल्याही भाषेचे वस्तुनिष्ठ पद्धतीने वर्णनात्मक व्याकरण लिहिता येऊ लागले. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारकांना जगभरातील विविध भाषांतून बायबलचे भाषांतर करायचे होते. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांना निरनिराळ्या भागात राहून स्थानिक भाषा शिकण्याची पाळी आली. ब्लूमफिल्ड प्रणित संरचनावादी पद्धतीने तयार झालेली भाषेची झटपट व्याकरणे या लोकांच्या गरजा भागवायला उपयोगी पडू लागली. त्यामुळे या पद्धतीचा खूप बोलबाला झाला. भौतिकशास्त्रांच्या तंत्राचा पाया त्यामुळे आलेला काटेकोरपणा व सफाई सार्वजनिक उपयोग क्षमता ही या अभ्यास पद्धतीची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे तिला अपूर्व यश मिळाले. तरी या पद्धतीवरही अनेक आक्षेप घेण्यात आले.

संरचना वाद्यांच्या यांत्रिक पद्धतीच्या भाषा वर्णनाविरुद्ध असंतोष वाढीला लागला १९५७ साली अमेरिकन भाषा वैज्ञानिक नोम चॉमस्कीचे सीट्रॅक्टिक स्ट्रक्चर्स हे पुस्तक प्रसिद्ध झाले. चॉमस्कीची विचारसरणी संरचनावादाच्या प्रतिक्रियेतून निर्माण झाली. त्याने संरचनावादी पद्धतीतील उणीवांकडे लक्ष वेधले. संरचनावादाने अर्थविचाराकडे दुर्लक्ष केले होते.  चॉमस्कीने वाक्य हा भाषा अभ्यासाचा मूल घटक म्हणून अर्थाचा अनुरोधाने वाक्याचे विश्लेषण करण्याची पद्धती स्वीकारली. त्याने मांडलेल्या रचनातंत्र प्रक्रियेमुळे वाक्यविचार आणि अर्थविचार या दोन विभागांना वर्णनात्मक अभ्यासात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. अर्थविचाराला मिळालेल्या महत्त्वामुळे भाषेचा अभ्यास, भाषा व्यवहार आणि समाज व्यवहार यांच्याशी जोडून केला जाऊ लागला.

भाषा अभ्यासाच्या वाटचालीमध्ये रविवार २ फेब्रुवारी १७८६ रोजी सर विल्यम जोन्झ यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या तिसऱ्या वार्षिक अधिवेशनामध्ये दिलेले व्याख्यान भाषाभ्यासाची नवी परंपरा निर्माण करणारे ठरले. यांनी या व्याख्यानामध्ये मांडलेल्या विचारातून भाषांच्या ऐतिहासिक अभ्यासाला प्रारंभ झाला. कालांतराने या अभ्यास पद्धतीची निकड म्हणून तौलनिक भाषाभ्यासाची जोड देण्यात आली. १९ व्या शतकामध्ये या अभ्यास पद्धतीला भाषाभ्यासाची मूलभूत पद्धती मानल्या जात होती. फर्दीना द  सोस्यूर हे या अभ्यास पद्धतीची भाषाभ्यास करणारे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांना या अभ्यास पद्धतीमधील मर्यादा जाणवायला लागल्या. त्यातून त्यांनी भाषाभ्यासासंदर्भात नवे विचार मांडायला सुरुवात केली. या प्रक्रियेतून त्यांनी मांडलेले नवे विचार आणि भाषांकडे पाहण्याची दिलेली नवी दृष्टी आधुनिक भाषाविज्ञानामध्ये केंद्रवर्ती राहिली.

सोस्युर यांनी आपल्या विचारांमध्ये 'रूप', 'व्यवस्था', आणि 'संरचना' या अमूर्त संकल्पनांना मध्यवर्ती स्थान दिले. भाषेकडे पाहण्याचा ऐतिहासिक दृष्टिकोन टाळून त्यांनी भाषेच्या एककालिक स्थितीवर आपले लक्ष केंद्रित केले आणि या स्थितीत भाषेची संरचना कल्पून या संरचनेचे विश्लेषण देण्यावर भर दिला. त्यांच्या या नव्या दृष्टीमुळे भाषाभ्यासाची दिशा बदलून गेली. आधुनिक भाषा विज्ञानाचा विकास सोस्यूर यांनी घालून दिलेल्या पायावर झाला. त्यांनी भाषाभ्यासात केलेले भाषिक वर्तन (Parole) आणि भाषा व्यवस्था (Langue) किंवा भाषा (Language)आणि भाषण (Speech) हे भेद आधुनिक भाषा विज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण ठरले. इतर कोणत्याही शास्त्राच्या तुलनेत भाषा विज्ञान आणि जी प्रगती साधली; त्यांच्या मुळाशी सोस्यूर यांच्या विचारांचे योगदान आहे सोस्यूर आणि सोस्युरच्या प्रभावाने विकसित झालेल्या युरोपीयन आणि अमेरिकन संरचनावादी भाषा अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून भाषा अभ्यासाच्या विविध शाखा विकसित झाल्या.

सोस्यूर यांनी भाषिक वर्तन हा भेद कल्पिला असला तरी, त्यांनी केवळ भाषिक व्यवस्थेलाच आपला अभ्यास विषय केला. सोस्यूर आणि त्यानंतरच्या संरचनावादी भाषा अभ्यासकांनीही ज्या भाषिक वर्तनामधून भाषेची व्यवस्था मिळते त्या व्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित केले. कोणत्याही विशिष्ट कालखंडामध्ये भाषा स्थिर मानून तिचे वर्णन करता येते; हा विचार सोस्यूर यांनी रुजविला. पाणी नेणे आष्टाध्यायी या आपल्या ग्रंथामध्ये भाषा विश्लेषणासाठी वापरलेल्या पद्धतीचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रभाव आधुनिक संरचनावादी भाषा अभ्यास पडलेला आढळतो म्हणूनच पाणिनीने 'अष्टाध्यायी' या आपल्या ग्रंथामध्ये भाषाविश्लेषणासाठी वापरलेल्या पद्धतीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आधुनिक संरचनावादी भाषाभ्यासावर पडलेला आढळतो. म्हणूनच पाणिनीच्या भाषा विश्लेषणाशी आजचे संरचनावादी भाषाविज्ञान नाते सांगते. वर्तनवादी मनोविज्ञानाचा अभ्यासक असलेला अमेरिकन भाषा वैज्ञानिक लेनर्ड ब्लूमफिल्ड याने भाषा हे एक प्रकारचे वर्तन असून तिचा शास्त्रीय अभ्यास करता येतो असे मत मांडले. आपल्या या मतानुसार नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास या संरचनावादी पद्धतीने होतो; त्याच पद्धतीने भाषेचाही अभ्यास करता येतो हे त्यांने दाखवून दिले.

साधारणतः १९३० ते १९५५ हा काळ संरचनावादी भाषा अभ्यासाचा काळ म्हणून ओळखला जातो. अमेरिकन भाषा वैज्ञानिक ब्ल्यूमफिल्ड हाच या अभ्यास पद्धतीचा प्रणिता आहे. वर्णविषयाचे विविध स्तर उलगडून दाखविणे, प्रत्येक स्तरावरील घटक स्पष्ट करणे, त्या घटकांचे अंत:संबंध स्पष्ट करून; या संबंधावर आधारलेली व्यवस्था स्पष्ट करणे अशा प्रकारच्या अभ्यासाला संरचनात्मक अभ्यास म्हणतात. भाषेच्या अभ्यासात ही पद्धती ब्लूमफिल्ड आणि त्यानंतर बर्नार्ड ब्लॉक, जॉर्ज ट्रेगर, झीलिंग हे, युजिन नायडा, मार्टिन जू, सलॉन बेल्झ, चार्लझ हॉकेट या अभ्यासकांनी वापरली. अमेरिकेमध्ये विस्तार पावलेली ही भाषा अभ्यासाची पद्धत असल्याने या अभ्यासाला संरचनावादी किंवा अमेरिकन संरचनावादी अभ्यासाची पद्धत म्हणून ओळखली जाते. स्वनविज्ञान, स्वनिमव्यवस्था, रुपिमव्यवस्था, वाक्यव्यवस्था आणि अर्थविन्यास असे पाच तर कल्पून ब्ल्यूमफिल्डने भाषाभ्यास केला. तथापि अर्थाचे क्षेत्र त्या व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे असल्याने या क्षेत्राचा शास्त्रीय अभ्यास अशक्य आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्या भाषा विचारातून त्याने 'अर्थ' स्तराला बाजूला ठेवले.

स्वनविचार

जगातील प्रत्येक मानव समूह विचारांचे व भावनांचे आदान-प्रदान करण्यासाठी ध्वनीयुक्त भाषेचा वापर करतो. मागील घटकांमध्ये आपण भाषाविज्ञान संकल्पना भाषा विज्ञानाचे स्वरूप व वर्णनात्मक भाषाविज्ञान विकास विस्ताराचा विचार आपण केला या घटकात आपण भाषेच्या वर्णनात्मक अभ्यास करणार आहोत. वर्णनात्मक भाषा विज्ञानात भाषेच्या स्वरूपाचा वस्तुनिष्ठ अभ्यास होतो. या पद्धतीला एककालिक अभ्यास पद्धती असेही म्हणतात. सोस्युर या भाषावैज्ञानिकाने सर्वप्रथम भाषा अभ्यासाचा एकेकालिक आणि कालक्रमिक असा भेद सांगून आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया घातला. कोणत्याही एका विशिष्ट कालखंडातील भाषेचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे वर्णनात्मक भाषाभ्यास होईल. या पद्धतीत भाषेचा अभ्यास करताना भाषेच्या विश्लेषणाला महत्त्व दिले जाते. मूल्यमापन केले जात नाही. वर्णनात्मक पद्धतीत एकाच भाषेच्या एकाच काळातील भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भिन्न वा निरनिराळ्या काळातील भाषांची तुलना या पद्धतीत केली जात नाही. वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये भाषेचे प्रमाण व लिखित रूपे अभ्यासली जात नाहीत तर भाषेच्या मौखिक म्हणजे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या रूपांना प्राधान्य दिले जाते. सहाजिकच भाषेच्या उच्चारण प्रक्रियेला या पद्धतीत अधिक महत्त्व असते. भाषा ही परिवर्तनशील असली तरी ती विशिष्ट कालखंड स्थिर असते असे मानून तिचा अभ्यास केला जातो.

वर्णनात्मक पद्धतीने भाषेचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम मानवी वागिंद्रियाची रचना व कार्य समजून घ्यावी लागतात. उच्चारणाच्या प्रक्रियेत मानवी वागिंद्रियातील ओठांपासून ते फुफुसापर्यंतचे अवयव सहभागी असतात. भाषेत वापरल्या जाणाऱ्या स्वनांचे उच्चारण त्या स्वरांचे गुणधर्म निश्चित करावे लागतात. स्वनांमध्ये स्वर आणि व्यंजन असे वर्गीकरण करून त्यांचे प्रयत्नावर आधारित उच्चार, स्थानानुसार, प्राणतत्त्वानुसार घोषानुसार वर्गीकरण केल्या जाते हा अभ्यास भाषा निरपेक्ष असतो.

वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीमध्ये भाषेच्या स्वन, स्वनिम, वाक्य आणि अर्थविन्यास या घटकांचा अभ्यास केला जातो. स्वनिम, रुपिम आणि वाक्य यांचा भाषासापेक्ष अभ्यास करावा लागतो. स्वनिम हा भाषेतील महत्त्वाचा घटक असल्याने भाषेचे नमुने गोळा करून अल्पतम ध्वनियुग्माच्या साह्याने स्वनिम निश्चित केले जातात. त्यावरून त्या-त्या भाषेची स्वनिम व्यवस्था सांगता येते. या पद्धतीत प्रत्यक्ष निरीक्षणाला आणि व्यवहारिक रूपांना प्राधान्य दिले जाते. परंपरेने चालत आलेले परंतु भाषेचे वापरात नसलेल्या स्वनिमांचा विचार केला जात नाही. उदा. मराठीच्या स्वरमालेतील ल व ऋ स्वर वापरले जात नाही. त्यामुळे यांचा विचार वर्णनात्मक पद्धतीत संभावत नाही. भाषेच्या स्वनिम निश्चितीनंतर रूपिमांचा अभ्यास केला जातो. भाषेतील सार्थ लघुत्तम रूप म्हणजे रुपिम होय. रुपिका-रुपिमां- रुपिकांतर या क्रमाने रुपविचार केला जातो. रूपदृष्ट्या भिन्न परंतु अर्थदृष्ट्या समान असणाऱ्या रूपिकांच्या समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संबोधास रुपिम असे म्हटले जाते.उदा. देऊळ आणि देवळ. 

रुपिमांचे  आशयसूचक आणि कार्यसूचक रूपिम असे प्रकार करता येतात. रुपिमांमधून शब्द आणि शब्दांच्या सानुक्रम रचनेमधून वाक्य बनते. भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासात वाक्याची रचना प्रथमोपस्थित संघटकाच्या सहाय्याने समजून घेता येते.

सुरुवातीस स्वनविचार, रूपविचार आणि वाक्यविचार एवढ्यापुरताच सीमित असलेल्या वर्णनात्मक भाषा अभ्यासात पुढे अर्थविचाराचाही समावेश होऊ लागला. भाषा ही संवादाचे माध्यम असल्याने अर्थाला विशेष महत्त्व आहे. अर्थ हा घटक मानवी जीवनाचा एक भाग असल्याने जीवनातील सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य संदर्भाचा परिणाम अर्थावर होत असतो. अर्थाचे स्वरूप स्थलकालसापेक्ष असू शकते. त्यामुळे अर्थनिष्पत्तीची व्याप्ती निश्चित करता येत नाही. तरीही अर्थाचे स्वरूप वर्णनात्मक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत घटकांमध्ये केला आहे.

भाषेचे स्वरूप

भाषा ही मानवी भावभावनांच्या आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम आहे. भाषेशिवाय मानवी जीवनाचा कोणताही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. मानवाच्या सर्व प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचे आदान प्रदान भाषेच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे भाषा ही मानवी जीवन विकासातील अपरिहार्य बाब बनली आहे अशा भाषेचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय भाषेचे महत्त्व कळू शकणार नाही. मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे उपजत सामर्थ्य असते. लहान मूल त्याच्या कानावर पडलेल्या ध्वनीचे अनुकरण करत करत भाषा संपादन करीत असते. भाषा संपादनाच्या संदर्भात भाषा वैज्ञानिकांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. उदा. मानवी अपत्याला बकरीच्या कळपात ठेवल्यास ते मुल केवळ बकरीचाच आवाज काढू शकते किंवा मराठी भाषकाच्या अपत्यास तेलगू भाषक परिवारात ठेवल्यास ते मूल तेलगू भाषा संपादन करते म्हणजेच भाषा संपादनाची प्रक्रिया ही श्रवणानुकरणातूनच सिद्ध होते. मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला 'भाषिक क्षमता' असे म्हणतात. मानवेत्तर प्राण्यांच्या मेंदूमध्ये ही भाषिक क्षमता नसल्याने ते विशिष्ट ध्वनीच्या पलीकडे आवाज काढू शकत नाहीत. या भाषिक क्षमतेच्या बळावर मानवी मूल वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत आपली मार्तृभाषा संपादन करीत असते.

भाषा ही आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरली जात असल्याने ती आपल्याला सोपी वाटते. परंतु या भाषेच्या अंतरंगात शिरल्यावर तिची गुंतागुंत निदर्शनास येते. शिवाय भाषा ही परिवर्तनशील असल्याने तिच्या उच्चारणात नेहमीसाठी काहींना काही बदल संभवत असतो. त्यामुळे एखाद्या भाषेला विशिष्ट मापदंड लावून मोजता येत नाही. भाषा ध्वनींनी बनलेली असते. मानवी भाषेत या ध्वनीच्या सानुक्रम रचना वापरल्या जातात. भाषेत सुटेसुटे ध्वनी वापरले जात नाहीत. तर त्यांच्या रचना वापरल्या जातात. या सानुक्रम रचनांच्या मागे अर्थसंकेत असतात. उदा. 'वड' या रचनेमध्ये व+अ+ड+अ असे छा ध्वनी समाविष्ट होत आहेत. परंतु ही रचना सानुक्रम नसल्याने अर्थहीन आहे. अशा रचना भाषिक व्यवहारात वापरल्या जात नाहीत. भाषेतील सानुक्रम रचनाच्या मागे जे अर्थसंकेत असतात ते रूढी-परंपरेने ठरलेले असतात. वडाला वडच का म्हणायचे पिंपळ का म्हणू नये याची कोणतेही उत्तर आपण देऊ शकत नाही. भाषा ही एक संकेत प्रणाली आहे ज्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणातून भाषेचा प्रवास सुरू असतो त्या पर्यावरणाचे परंपराचे संकेत भाषा स्वीकारत असते. उदा. आजच्या संगणकीय युगात आपण संगणकीय प्रणालीशी संबंधित असणारे अनेक शब्द घडवलेले आहेत.

भाषिक संप्रेषण

भाषिक संप्रेषणात वक्ता आणि श्रोता असे दोन घटक समाविष्ट असतात. वक्त्यांच्या मनातील आशय ऐकणाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचणे व त्याला समजणे याला 'भाषिक संप्रेषण' असे म्हणतात. संप्रेषण या शब्दासाठी संज्ञापन, विनिमय, संदेशन, संवाद असे पर्यायी शब्द वापरता येतात. मानवी भाषेत सुमारे 30 ते 70 ध्वनिघटक (स्वर व व्यंजने)  असतात. या दोन्ही घटकांच्या सानुक्रम कालरचना आणि त्या मागील संकेतप्रणाली निजभाषकाला ज्ञात असते. या सामग्रीच्या बळावर आपण भाषिक संप्रेषण साधू शकतो. मातृभाषा आत्मसात केल्यावर आपण सहजपणे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनाही भाषेतील अर्थसंकेत माहीत असल्याशिवाय भाषिक विनिमय होऊ शकत नाही. उदा. बोलणारा कन्नड भाषेतून संभाषण करीत आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे ध्वनी ऐकणाऱ्यापर्यंत जाऊनही पोहोचतात. परंतु ऐकणाऱ्यास त्या ध्वनीची संकेत प्रणाली ज्ञात नसेल तर तेथे भाषिक संप्रेषण होऊ शकत नाही. म्हणून वक्त्यांच्या मनातील आशय ऐकणाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचणे याला जेवढे महत्त्व आहे. तेवढेच तो  ऐकणाऱ्या आशय समजणे यालाही महत्त्व आहे ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे दाखवता येईल.

                भाषिक संप्रेषण 

बोलणारा (वक्ता)            ऐकणारा(श्रोता)

आशय - संकेतीकरण- ध्वनिनिर्मिती - ध्वनिग्रहण - विसंकेतिकर - आशय

बोलणाऱ्याच्या मनात असे असतो तो बोलणे आधी मनातल्या मनात त्या आशयाचे संकेतीकरण करतो एकदा त्याला नेमके काय म्हणायचे आहे हे निश्चित झाले की तो ध्वनी निर्मिती करतो. म्हणजे बोलतो ऐकणाऱ्यापर्यंत ध्वनी जाऊन पोहोचतात. सर्वप्रथम तो ध्वनी ग्रहण करतो नंतर ध्वनी रचना मागील अर्थसंकेत ऐकणारा उलगडून घेतो. तेव्हा त्याला बोलणाऱ्याच्या मनातील आशय कळतो. बोलणाऱ्याची प्रक्रिया आशायाकडून ध्वनी निर्मितीकडे जात असते. तर ऐकणाऱ्याची प्रक्रिया ध्वनीग्रहणाकडून आशयाकडे जात असते.

थोडक्यात, भाषा ही सानुक्रम ध्वनी रचनांच्या सांकेतीकरणावर आधारलेली संप्रेषण प्रणाली आहे. जगातील प्रत्येक भाषेला तिची अंगभूत नियम व्यवस्था असते. त्याप्रमाणे त्या त्या भाषेचा व्यवहार सुरू असतो. शब्दसिद्धी, वाक्यरचना कशी करायची तर त्याच्या जागी कोणते शब्द वापरायचे सर्वनामांचे प्रयोग कसे करायचे? काळाचे प्रयोग कसे करायचे? इत्यादी बाबतीत त्या त्या भाषेची एक विशिष्ट व्यवस्था असते.

भाषेची लक्षणे

माणूस जस जसा उत्क्रांत होत गेला तस तशी भाषा ही विकसित होत गेली भाषेचा शोध ही मानवी उत्क्रांतीची महत्त्वपूर्ण उपलब्ध मानावी लागेल माणूस हा सुरुवातीपासूनच समूहाने राहणारा प्राणी असल्याने प्रत्येक समूहाची भाषा ही वेगवेगळी असते जगातील कोणत्याही दोन भाषा एक दुसरी सारखे नसतात प्रत्येक भाषेची स्वतंत्र व्यवस्था असते असे असले तरी सर्व भाषांच्या स्वरूपात आणि कार्यात काही सारखेपणा आढळतो यासारखेपणाच्या आधारे काही समान लक्षणे ठरविता येतात हा हॉकेट या भाषा वैज्ञानिकांनी भाषेची पुढील सात लक्षणे सांगितले आहेत.

१. द्वि-स्तरीय रचना

मानवी भाषेत सामान्यत:३० ते ७० मुलध्वनी असतात. सानुक्रम रचना करून या मर्यादित ध्वनीच्या आधारे अमर्यादित शब्दाची निर्मिती आपण करू शकतो. यास भाषेची दुहेरी संरचना असे म्हणतात. भाषिक रचनेतील प्रमुख दोन स्तर पुढीलप्रमाणे

१. असेचा प्रथम स्तर- मूळ ध्वनीचा मर्यादित साठा

२. दुसरा स्तर - मूळ ध्वनीच्या स्वतंत्र वेगवेगळ्या रचना सानुक्रम तयार करून त्यातून निर्माण होणारा अर्थ.

उदा. मराठीतील 'स' आणि 'र' या दोन मूलध्वनींच्या पुढीलप्रमाणे अर्थपूर्ण रचना करता येतात.

स+र - सर

र+स - रस

र+स+र+स - रसरस

स+र+स+र- सरसर

स+र+स - सरस

२. यादृच्छिकता (योगायोग)

सर्व भाषा यादृच्छिकतेचे तत्व पाळताना दिसतात. यादृच्छिकता म्हणजे शब्द आणि त्या शब्दाने सुचित होणारा अर्थ यात कुठल्याही अर्थाअर्थी किंवा कार्यकारण संबंध नसणे. झाडाला झाडच का म्हणायचे? घर का म्हणू नये यामागील निश्चित कार्यकारण संबंध सांगता येत नाही. शब्द व अर्थ यांचे नाते हे केवळ परंपरेवर अवलंबून असते. ज्याने कोणी झाडाला झाड म्हटले तेव्हापासूनच म्हणजेच परंपरा संकेत व रुढीने हा अर्थ घेतला गेला आणि याला समाजाची मान्यता मिळाली. यादृच्छिकतेत जुने भाषिक संकेत टाळून नवीन भाषिक संकेत, संदेश तयार करता येतात किंवा त्यात नवीन सुधारणा घडवून आणता येते. त्यामुळेच भाषाभाषांमध्ये असणारा वैशिष्ट्यपूर्ण फरक आपल्या लवकर लक्षात येतो. तो केवळ या भाषेतील यादृच्छिक लक्षणांमुळेच. या लक्षणांमुळेच जगातील प्रत्येक भाषा ही दुसऱ्या भाषेपेक्षा वेगळी ठरते.

३.निर्मितीशीलता

आपण पूर्वी कधीही ऐकलेला नाही किंवा उच्चारण्याचा प्रयत्नही केलेला नाही असा एखादा नवा शब्दप्रयोग किंवा भाषिक वाक्यरचना आपण तयार करू शकतो. भाषेच्या संवाद प्रक्रियेत नवनवीन शब्द आणि रचना घडत राहतात आवश्यकतेनुसार माणूस आपल्या भाषिक कौशल्याचा वापर करून नवीन भाषिक प्रयोग करू शकतो हे सोय केवळ मानवी भाषेत शक्य आहे मानवी तर प्राण्यांच्या भाषेत ही निर्मितीशीलता नसते भाषेच्या या निर्मितीसाठी मुळे भाषेची विनिमय क्षमता अमर्याद झाली आहे. भाषेच्या या लक्षणामुळेच भाषा समृद्ध झाली व भाषेचा विकास झाला असे आपण नेहमी म्हणतो.

४. अदलाबदल

मानवी भाषेत बोलणारा व ऐकणाऱ्याचे आदान-प्रदान किंवा अदलाबदल ही शक्य होते. एकमेकांच्या भाषिक संरचना एकमेकांना समजल्यास माणूस आपल्या भाषेच्या आधारे दुसरी भाषा आत्मसात करू शकतो. मानवी भाषेत बोलणारा आणि ऐकण्याच्या भाषिक रूपाचे आदान प्रदान करून किंवा अदलाबदल करून नवीन भाषिक कौशल्य आत्मसात करतो. त्या अदलाबदल या लक्षणामुळे मानवी भाषा अधिकाधिक समृद्ध होत आहेत.

५. विशिष्टता

एका मर्यादित भाषिक रचनेतून मोठा अर्थ सूचित करण्याचे सामर्थ्य फक्त मानवी भाषेतच असते आणि यालाच भाषेचा विशिष्टपणा असे म्हणता येते.

कोणतीही भाषिक क्रिया ही दुसऱ्याला काहीतरी सुचविण्यासाठी सांगण्यासाठी केलेली असते. 'जेवण तयार झालं बरं!' असे गृहिणीने उच्चारलेले वाक्य कानावर आल्यानंतर पुढीलप्रमाणे वेगवेगळे अर्थ आपल्याला सुचित होतात.

१. जेवण करण्यासाठी हात स्वच्छ पाण्याने धुवावे.

२. स्वयंपाक करून झालेला आहे.

३. ताटे वाढून झाली.

४. जेवणाला या

असे विविध अर्थ आपल्याला सूचित होतात. या भाषेतील गुणधर्मामुळे वेळ, श्रम, कष्ट याची बचत होते. त्याचबरोबर मानवाच्या कार्यशक्तीतही वाढ होते आणि भाषिक संदेशन प्रक्रियाही सहज आणि प्रभावी होते.

६. स्थलकालातीतता

भाषा ही स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून आपला भाषिक विनिमय साधू शकते एखादी गोष्ट समोर नसताना सुद्धा तिच्यावर आपण भाष्य करू शकतो स्थल काला तिथे त्याच्या या लक्षणांमुळे माणूस आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो.

उदा. वर्डस्वर्थच्या 'डेफोडिल्स' या कवितेतील 'डेफोडिल्स' हे पिवळ्या रंगाचे फुल आपण पाहिलेले नसते तरीही आपण ते फुल शब्द सामर्थ्याने मनापुढे उभे करतो. अशी स्थळकालीकता  मानवेत्तर प्राण्यांच्या भाषेत नसते.

७. सांस्कृतिक संक्रमण

भाषेमुळे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक संक्रमण घडत असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भाषिक विनिमयातून संस्कृतीचे स्थलांतर व कालांतर घडत असते. त्यामुळे संस्कृतीचे संक्रमण व संवर्धन होत असते. या भाषेच्या खास क्षमता आहेत. मानवी संस्कृती जसजशी विकसित होत जाते तसतशी काळाच्या ओघात अनेक नवनवीन शब्दाची भर पडत असते. विज्ञानातील विविध शोध, सांस्कृतिक वातावरणात झालेले बदल, जागतिकीकरणातून आलेली मॉल संस्कृती, याबरोबर संगणक, मोबाईल ई-मेल, एस.एम.एस., लॅपटॉप इत्यादी अनेक संकल्पनात्मक शब्दप्रयोग भाषेत सहज रूढ होताना आढळतात. मानवाने मिळविलेल्या ज्ञानाचे जतन हे भाषेद्वारे केले जाते आणि हेच ज्ञान सांस्कृतिक संक्रमणाद्वारे समृद्ध करता येते. हेच ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढी भाषेद्वारे संक्रमित होत असते.

वरील विवेचनावरून भाषेचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतात 

१. भाषा ही एक पद्धत आहे. मोजक्या मूळ ध्वनीच्या सामर्थ्यावर भाषा ही आकारला येते. त्या मोजक्या मर्यादित मूळध्वनींचा वापर सानुक्रम पद्धतीने केलेला असतो. 

२.भाषा ही यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली असते आणि हे दोन्ही संकेत रुढीने व परंपरेने निश्चित केलेले असतात. ३. भाषेचा मूळ आशयाशी घनिष्ठ संबंध असतो. शब्द व त्या शब्दाचा मूळ अर्थ यांच्यात अंतरिक संबंध असतो. शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ लगेच आपल्या मनात उत्पन्न होतो.

४.  भाषेचे उच्चारण हे मौखिक असते, म्हणजे भाषिक ध्वनीचे उच्चारण हे सलग सानुक्रमे होत असते. ज्या क्रमाने ध्वनीचे उच्चारण होते त्याच क्रमाने आपण हे दोन्ही ग्रहण करतो. म्हणून भाषेचे स्वरूप हे मौखिक असते.

५. भाषेची रचना ही वैधर्मयुक्त असते. 

६. भाषा ही ध्वनींनी बनलेली असते. भाषेत असे असंख्य ध्वनी असतात. ७.भाषा ही प्रतिकात्मक ध्वनी संकेतावर आधारलेली असते.

८. भाषा ही रुढी व परंपरेने आकाराला आलेली असते.

९. भाषेला इतिहास असतो.

१०. भाषा ही परिवर्तनशील असते 

११. भाषेचे स्वरूप रेखिक असते.

भाषाभ्यासाची अंगे


स्वनविज्ञान : संकल्पना

 २.१ स्वनविज्ञान संकल्पना

 २.३ वागिंद्रियाची रचना व कार्य

  २.४ स्वनांचे वर्गीकरण



बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...