मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

जमातवाद - समस्या

भारतीय समाजातील ज्वलंत मुद्दे या अभ्यासघटकांतर्गत ‘जमातवादाची समस्या’ या उपघटकाचाही यूपीएससीच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर १ मधील अभ्यासक्रमात समावेश केला आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या लेखी चाचणीत जमातवादाच्या समस्येला स्पर्शून जाणाऱ्या देशातील बहुविधतेच्या सांस्कृतिक घटकासंबंधी आणि राष्ट्रीय अस्मिता बांधणीसाठी या बहुविधतेची प्रस्तुतता यावर प्रश्न विचारण्यात आला. खरेतर बहुविधता आणि जमातवाद यांचे नाते परस्परविरोधी आहे.
वसाहतिक काळापासून जमातवाद भारतातील एक प्रमुख सामाजिक समस्या बनून राहिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या समस्येने वरचेवर उग्र रूप धारण करीत संपूर्ण समाजाला विळखा घातलेला दिसून येतो. २०१५ मध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या दादरी प्रकरणामुळे आणि त्यावरील प्रतिक्रियांमुळे जमातवादावरील चच्रेने पुन्हा एकदा उचल खाल्ली. विद्यार्थ्यांनी प्रथमत: जमातवादाची मूळ संकल्पनात्मक धारणा समजून घ्यावी. त्यानंतर सामाजिक प्रक्रियेतील कोणत्या पोकळीतून जमातवादी जाणिवा निपजतात, तसेच विभिन्न सामाजिक घटकांवर कोणत्या प्रकारचा प्रभाव टाकतात यावरही दृष्टीक्षेप टाकणे गरजेचे आहे.
देशातील या मूलभूत समस्येवर वेळोवेळी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध होतात. बिपीनचंद्र यांच्या ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ तसेच ‘आधुनिक भारतातील जमातवाद’ या संदर्भपुस्तकातून जमातवादाच्या प्रक्रियेचे विश्लेषण सापडू शकते. राम आहुजा यांच्या ‘सोशल प्रॉब्लेम्स’ या पुस्तकामधून ही समस्या समजून घेता येईल.
यूपीएससीच्या लेखी चाचणीमध्ये या समस्येवर कुठल्या प्रकारचे प्रश्न भविष्यात विचारले जाऊ शकतात याचाही तर्क बांधावा लागतो. जमातवादाच्या स्वरूपासंबंधी थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जमातवादाला चिकटून असलेल्या मुद्यांना धरूनही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. उदा. सामाजिक सद्भाव, सामाजिक ऐक्य, सामाजिक वीण, सामाजिक सहिष्णुता, सामाजिक ध्रुवीकरण या मुद्द्यांवर प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे, कारण हे सर्व मुद्दे वर्तमानातही उपस्थित आहेत. या उपघटकाची तयारी करताना अभ्यासाचा पट व्यापक ठेऊन या समस्येशी संबंधित असलेल्या वर्तमान मुद्यांना तो धरून असावा.
कम्युनॅलिझम या संकल्पनेला मराठीत ‘जमातवाद’ अथवा ‘सांप्रदायिकता’ असेही शब्दप्रयोग वापरले जातात. धर्मिक मूलतत्ववाद या अंगानेही जमातवादाचा अभ्यास केला जातो. जमातवादाचे संकल्पनात्मक स्पष्टीकरण करायचे झाल्यास, ज्यावेळी एखादा धार्मिक समुदाय दुसऱ्या धार्मिक समुदायाविरुद्ध धर्माच्या आधारावर संघर्ष करण्यास प्रवृत्त केला जातो तेव्हा जमातवादाचा जन्म होतो. सर्वसामान्यांची रुढीप्रियता, धर्मभोळेपणा याचा वापर करून एखाद्या समुदायाला दुसऱ्या धार्मिक समुदायाविरुद्ध उभे केले जाते, त्यातून धर्माचे राजकारण आकार घेते. थोडक्यात, जमातवाद म्हणजे दोन समुदायामध्ये धर्माच्या आधाराने संघर्ष निर्माण होणे.
जमातवाद समुदायाच्या धार्मिक अस्मितेवर भर देतो. प्रत्येक धार्मिक समुदायाचे हितसंबंध विभिन्न असतात किंबहुना परस्पराविरोधी असतात. परिणामत: एका विशिष्ट धार्मिक समुदायाला आपल्या हितसंबंधाची जपणूक करायची म्हटले तर दुसऱ्या धार्मिक समुदायावर मात करण्याशिवाय पर्याय नसतो. थोडक्यात धार्मिक समुदायात संघर्ष अटळ ठरतो. ‘धर्म’ या घटिताच्या आधारे सामाजिक हितसंबंधाची जपणूक करता येते आणि त्यांच्या पूर्ततेसाठी जमातवाद धर्माच्या आधारे संघटन करण्याचा प्रयत्न करीत असतो.
वसाहतिक शासनाच्या कूटनीतीतून आणि त्यांच्या इतिहासलेखनातून जन्माला आलेली सांप्रदायिकतेची समस्याही आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेत असलेल्या भारतासमोरील एक मुख्य गतिरोधक बनून राहिली. गांधी काळापासून राष्ट्रीय स्वातंत्र्याबरोबर िहदू-मुस्लीम ऐक्याचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आलेला दिसतो. फाळणीच्या अनुभवानंतर नेहरूंनी स्वतंत्र भारतात जमातवादाला शह देण्यासाठी विविधतेतच भारताची संस्कृती लपलेली असून सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेतूनच सामाजिक एकता निर्माण करणे सशक्त भारतासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. नंतरच्या काळात जमातवाद आणि राजकारण याची सरमिसळ होऊ लागल्याने या समस्येचे निराकरण करणे शासनाच्या आवाक्याबाहेरचे राहिले. हे लक्षात घेता जमातवादाचे राजकारण किंवा जमातवाद आणि राजकारण यांच्या आंतरसंबंधावर आगामी काळात प्रश्न येऊ शकतात.
शासन संस्थेद्वारा जमातवादी प्रक्रियेला गोंजारण्यातून जमातवादाची समस्या अधिकाधिक बळकट होत जाते. परिणामत: सामाजिक लोकशाही अडचणीत येते. सामाजिक मने दुभंगून समाजाची घडी विस्कटू लागते आणि सामाजिक एकोपा तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये विभागू लागतो. अशावेळी जमातवाद ही समस्या सामाजिक न राहता राजकारणावर कुरघोडी करू लागते. अर्थात तिचे रूपांतर राजकीय समस्येत होते.
जमातवादाच्या समस्येचे सामाजिक आणि राजकीय संदर्भ पाहता त्यातील जटिलता लक्षात येऊ शकते. विभिन्न समुदायांतर्गत लोकशाही जाणिवा स्थापित झाल्याविना राष्ट्राची अखंडता अबाधित राहू शकत नाही. त्यामुळेच जमातवादाचा मुद्दा आंतरिक सुरक्षेसमोर एक मोठे आव्हान उभे करतो. या संदर्भातही लेखी चाचणीत प्रश्न विचारला जाण्याची शक्यता अधिक आहे.
जमातवादी प्रक्रियेने संविधानकृत नागरिकांना प्रदान केलेल्या ‘भारतीय’ या विवेकपूर्ण राष्ट्रीय अस्मितेसमोरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसते. या प्रक्रियेमध्ये समाजातील व्यक्तींना सांप्रदायिक ओळख प्रस्तुत करण्याचा प्रयत्न होत राहतो. ‘आपण आणि ते’ अशी समाजाची वर्गवारी करण्याचा त्यातून प्रयत्न होतो. विशिष्ट अशी जमातीय ओळख प्रदान करण्यात सांप्रदायिक घटक गुंतलेले असतात. सामाजिक ताणाच्या निर्मितीतून संशयाची आणि शत्रुत्वाची भावना उपजते. एकमेकांकडे पाहण्याचे दृष्टिकोनही सांप्रदायिक बनू लागतात. इतिहास आणि सांस्कृतिक प्रतिकांचा आधार घेऊन सारासार विवेकाऐवजी भावनिकतेला आवाहन करून लोकांना कृतीसज्ज केले जाते. त्यातून बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्याक अशा अस्मिता आणि संघर्ष डोके वर काढतात.
खुल्या आíथक धोरणांच्या विसंगत प्रक्रियेतून परिघावर फेकले गेलेल्या समाजघटकांमध्ये सापेक्षवंचिततेची जाणीव तयार होऊन सामाजिक तुटलेपण येऊ लागते. असे नाराज समाजघटक जमातवादी प्रक्रियेत ओढले जातात किंवा त्या प्रक्रियेचे बळी ठरतात. संसाधनांची कमतरता आणि त्यातून इतरांची संसाधने बळकावण्याची प्रक्रिया जमातवादाच्या उदयाचे आणखी एक कारण ठरते. माहिती-तंत्रज्ञानाच्या काळात दृक् श्राव्य माध्यमाच्या वापरातून आपल्या कृतिकार्यक्रमांना सहमती मिळवत जमातवाद आपले भरणपोषण करतो.
जमातवादामुळे सामाजिक सहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही घटनात्मक मूल्ये आक्रसली जातात. परस्परांच्या संस्कृतीविषयी आदर आणि आपली मते स्पष्ट मांडण्यास आडकाठी येते. सामाजिक सहिष्णुता घट्ट करण्यासाठी अल्पसंख्याकांना विश्वासात घ्यावे लागते. खरेतर लोकशाही शाश्वत करणे आणि खोलवर रुजवण्यासाठी या सामाजिक मूल्यांची गरज ठरते.
राष्ट्र-राज्याची अखंडता टिकण्यासाठी सामाजिक लोकशाहीचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनसंस्था आणि नागरी समाज यांना घ्यावी लागते. याउलट विभिन्न समुदायांमध्ये परस्पराविषयी भीतीसदृष्य वातावरण तयार झाले असता सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया दूषित होऊन राष्ट्रीय एकजिनसीपणा धोक्यात येतो. २०१५ मध्ये असहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून भारतीय राजकारण ढवळून निघाले. त्यामुळे आगामी काळात मुख्य परीक्षेमध्ये यासंबंधी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता लक्षात घेता या अंगानेही जमातवादाचा अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संवाद कौशल्य

संवाद कौशल्य (Communication Skills) संवाद कौशल्य म्हणजे व्यक्तीने आपले विचार, भावना, माहिती आणि अनुभव इतरांपर्यंत स्पष्ट, प्रभावी आणि समजण्य...