सोमवार, २७ एप्रिल, २०२०

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आरोग्य विचार


   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून व आपल्या भजनाद्वारे जी लोक जागृती व प्रबोधन केले आहे ते आजच्या काळातही तेवढेच महत्त्वाचे आहे त्यांच्या विचारधारेत वैज्ञानिक दृष्टिकोण आपणास दिसतो. त्यांनी रचलेली राष्ट्रवंदना त्यातही ते म्हणतात की, 'तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा' महात्मा गांधी  म्हणतात, ''की देशातील व्यक्तीचा मन मेंदू मनगट यांचा विकास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सर्व उपाय आहे कुचकामी आहेत. राष्ट्रवंदनेत  सर्वधर्मसमभावाचे तत्व आहे. 
देशातील माता स्त्रीचा सन्मान आहे. ग्रामनाथ व सैनिक यांच्या कर्तृत्वाचा उद्धार आहे. देशातील रंक,राव, पंडित, भिकारी यांच्या सुखाचे स्वप्न राष्ट्रसंत पाहतात.
स्पृश्य-अस्पृश्य कलंक मिटण्यासाठी कर्तव्यशीलतेचा आग्रह शील- नैतिकतेचा स्वीकार महाराजांनी देशवासीयांकडून अपेक्षिला आहे. स्वतःमधील विश्वास वाढण्यासाठी ब्रह्मचर्य, अध्यात्म गुण वाढविण्याचा आशावाद व्यक्त ते करतात. 'सारा भारत रहे सिपाही शत्रू को दहशाने' शिपाही म्हणजे सेवक आज आज  खऱ्या अर्थाने करोनासारखी महामारीसंपूर्ण जगावर आलेली आहे; तेव्हा या देशातील डॉक्टर्स आरोग्य अधिकारी कर्मचारी दवाखान्यातील स्टाफ आणि सर्व जनता सर्व देशासाठी सेवक शिपाई झालेली दिसते यावरूनच भविष्यात भारत सक्षम व सामर्थ्यवान होईल ही भविष्यवाणी राष्ट्रसंतांची सार्थ ठरेल तो सुदिन असेल.
ग्रामगीतेत सत्तर वर्षापूर्वी स्वच्छता, संसर्ग रोगाचा प्रसार व परिणामाबाबत तुकडोजी महाराजांनी सांगितले होते. आज बावीस मार्च दोन हजार वीस पासून संपूर्ण भारत लोक डाऊन आहे. घरातच रहा सुरक्षित रहा व करोनापासून देशाला दूर ठेवा. करोनास हद्दपार करा असे शासन सांगते आहे. या शासनाच्या हाकेला प्रतिसादही भारतीय जनता देत आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रसंतांचा आरोग्यविचार संदर्भाने जे विचार ग्रामगीतेत येतात ते पुन्हा एकदा नव्याने सांगण्याचा हा प्रयत्न या शोधनिबंधात केलेला आहे.
 भारतीय संस्कृतीत मानवाचे आयुष्य एका शतकाचे दर्शविले आहे. त्याचे चार भाग केलेले आहेत. त्यानुसार शरीराच्या अवस्था विशद केलेल्या आहेत. प्रत्येक भाग २५ वर्षाचा ठरविलेला आहे. या चारही अवस्थेत शरीर सुदृढ व उत्तम आरोग्यशील असावे अशी अपेक्षा केलेली आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय प्रयत्न करावेत  याबाबत ग्रामगीतेत हितोपदेश केलेला आहे.
बाळाच्या विकासासाठी माता-पित्याने कोणती पथ्ये पाळावीत याबाबत ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायात काही सूचना केलेल्या आहेत.
 संस्कार दुष्परिणाम कारी। न पडावे आतील गर्भावरी।
 म्हणोनि माता-पित्यांनी सदाचारी। सदाचारी राहावे सद्भावे ।।
न करावे अश्लिल भाषण। न बघावे दृश्य हीन।
न राहावे व्यसनाधीन। दुर्गुणी अन्न न खावे।। आहार-विहार सात्विक पूर्ण। उत्तम गुणी चिंतन, वाचन। न ऐकावे शृंगार गायन। गर्भवतीस घेवोनि ।।(ग्रामगीता अध्याय दुसरा ओवी अनुक्रमे ३५,३६,३७)
सध्याच्या काळात गर्भवती घरात बसून राहू शकत नाही. तिला घराचे बाहेर दैनिक व्यवहार करावेच लागतात. अनेक स्त्रियांना नोकरी करावी लागते, उद्योगास जावे लागते, मजुरी करावी लागते. पती सोबत राहून अनेक कामात लक्ष द्यावे लागते. टीव्ही घराघरात असल्यामुळे त्यातील दृश्य दिसतात. त्यातील शृंगारिक गायन ऐकावे लागते. अशी स्थिती असली तरी गर्भवतीने आपल्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी उत्तम संस्कारासाठी स्वतःवर काही बंधने घातली पाहिजेत. जन्म देणाऱ्या बाळाच्या भवितव्याचा विचार तिने केला तर त्याचे संस्कार पोटातील बाळावर होतात. बाळाचा विकास करणे म्हणजे आपल्या गावातील एका घटकाचा विकास करणे हे माता-पित्याने ध्यानात ठेवावे हेच महाराजांना सांगायचे आहे. माता पिता जे सेवन करतात त्याचा प्रभाव बाळाच्या वाढीवर होत असतो म्हणून सात्विक आहार घेणे अत्यावश्यक आहे. छात्रालयातील विद्यार्थ्यांनाही सात्विक- साधे भोजन दिले पाहिजे. आजचे बालक हे उद्याचे नागरिक हे लक्षात ठेवून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सात्विक भोजन देणे अत्यावश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी आदर्श दिनचर्या असावी असे ग्रामगीतेत महाराज सांगतात. आपल्या शरीराची उत्तम वाढ व्हावी आणि आपले उत्तम आरोग्य लाभावे यासाठी उत्तम दिनचर्या प्रत्येक ग्रामस्थाची असली पाहिजे यावर महाराजांचा कटाक्ष होता. त्यांच्या आश्रमात दिनचर्या ठरलेली असे आणि आजही दिनचर्या ठरलेलीच असते.
त्याची वैशिष्ट्ये अशी आहेत 
वेळेवरि झोपवावे, जागवावे (अ.२,५६) कराया लावावे प्रात:ध्यान(अ.२, ५७) नित्यनियमाने उष:पान। सूर्यनमस्कार आसन।  पोहणे आणि निंबसेवन।  आरोग्यदायी जे सोपे।।(अ.२,५८)
शीतजले करवावे स्नान। सकाळी रानीवनी गमन। करवावे नेहमी पठणपाठण।  चारित्र्यवंताचे।।(अ.२, ५९) राष्ट्रसंतांच्या मते गाव व्हावया निरोगी, सुंदर। सुधारावे लागेल एकेक घर। आणि त्याहूनि घरात राहणार। करावा लागेल आदर्श।। (अ.२,२२) व्यक्ती व्हाया आदर्श सम्यक। पाहिजे दिनचर्या सात्विक।  सारे जीवन निरोगी सुरेख।  तरीच होईल गावाचे।।(अ.१४,२३) उत्तम दिनचर्या असली तर नागरिकांचे उत्तम आरोग्य राहील त्यामुळे सारे ग्रामस्थ स्वस्त दिसतील ते ग्राम विकास कार्यात सहभागी होऊ शकतील असे महाराज सांगतात. उत्तम आरोग्यासाठी सात्विक भोजन घ्यावे. भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद होय आणि या प्रसाद सेवनाने उत्तम आरोग्य लाभते परंतु हा प्रसाद निवडणे ही प्रत्येक व्यक्तीची आणि कुटुंबाचे काम आहे. अन्न हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. राजस, तामस व सात्विक भोजनाची प्रकार अनेक हे खरे असले तरीही महाराज म्हणतात त्यात आपली शक्ती पाहुनी सम्यक। पचेल तैसे करावे। (अ.१४,८८) जे अन्न आपण खातो ते पचलेच पाहिजे, अन्न पचन न झाल्यास शारीरिक विकार वाढतात, रोग निर्माण होतात.
खाद्य आणि रोग यांचा संबंध आहे. खाद्य आणि भोग यांचे विशिष्ट नाते आहे. खाद्य आणि संस्कार यांचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आहेत याची जाणीव करून देताना ग्रामगीतेत कोणी खाद्य रोग करी। कोणी खाद्य भोग करी। कोणी खाद्य वाईट संस्कारी। करिते प्राण्या।। (अ.१४,९०) जे लोक सात्विक अन्न सेवन करतात त्यांच्यात सात्विक विचार प्रवर्ततात पण राजस-तामस अन्न सेवन करणाऱ्यात राजस-तामस विचार येतात.
मद्यमांसाहार करिती कोणी विकार बुद्धी वाटे मनमानी।  भलतेचि रोग जाती लागून। सांसर्गिक आदी।। (अ.१४,९४) म्हणून मद्यमांसाहार मानवाने टाळाच पाहिजे. जैसे ज्याचे रक्तरसगुण। तैसे त्याचे विचार होती स्फुरण। हे कुणीहि विसरता कामा नये. काही क्रूर दिसतात काही शूर दिसतात काही मंद बुद्धीचे दिसतात तर  काही बुद्धिमान दिसतात त्याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे आहारच होय.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या व गैरसमजुती ग्रामीण सामाजिक जीवन प्रथा परंपरा व अंधश्रद्धा इत्यादी लक्षात घेऊन ग्रामगीतेतून ग्रामीण भागातील मनुष्याच्या सुदृढ आरोग्याचा संदर्भात प्रबोधन केले आहे. 'आरोग्य हीच खरी संपत्ती' या उक्तीप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आरोग्याचे महत्त्व आहे. पूर्वी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात साथीचे आणि संसर्गजन्य आजार होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य मृत्युमुखी पडत होते. आज करोना सारख्या सांसर्गिक रोगाने संपूर्ण जगास हैरान केले आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि अंधश्रद्धेचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजारावर योग्य प्रकारे उपचार होत नव्हता. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून देवी-देवतांचा खूप झाला असे समजून देवदेवतांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न केल्या जात होते अशा गावची परिस्थिती लक्षात घेऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात देवदेवता किंवा परमेश्वर ही मनुष्याच्या कल्याणासाठी उद्धारासाठी आहे त्याचा कोप कुणावरही नसतो. देवतांचा कोपकोणावारही नसतो. सर्व लोक परमेश्वराची लेकरे असल्यामुळे परमेश्वर कोणाची छळवणूक करीत नसून आरोग्याची हानी करण्यासाठी आपण स्वतःच जबाबदार व कारणीभूत आहोत हे महाराजांनी पटवून दिलेले आहे.
सर्व लोक लेकरे त्याची। छळना कां करील कोणाची?
 कृती आपलीच आपणा जाची। शत्रू आपणचि आपुले।।( ग्रा.अ.१४, ओवी ७)
 आपली कृतीच आपल्याला त्रास देते व आपली शत्रु बनते. आपणच आपल्या आजूबाजूला घाण करतो. त्यातूनच रोग जीवजंतूची निर्मिती होऊन निरनिराळे साथीचे आणि संसर्गजन्य रोग निर्माण होतात. आपली नियमितपणे जीवनशैली नाही. आहार-विहार नाही. हवा पाणी वातावरण शुद्ध नाही. खाण्यापिण्याच्या सवयी नियमित नाही. अशा या अनियमितपणाने शरीरातील सप्तधातू दूषित होऊन आपण रोगाला बळी पडतो. पूर्वीचे शहाणे लोक म्हणत, 'हॉटेली खाणे मसणा जाणे' आज तर शहराशहरात होटेलात   दवाखाने व डॉक्टर बाबत विश्वास वाढलेला आहे.
पन्नास वर्षांपूर्वी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलेले आहे की,गावा असो वा शहर  तेथील जीवनशैली बिघडली  म्हणूनच लोक रोगांनी ग्रासलेले आहेत.
 गाव असो अथवा शहर। तेथील बिघडले आचार-विचार। म्हणूनीच रोगराईने बेजार। जाहले सारे जनलोक।।
 गाव व्हावया निरोगी, सुंदर। सुधारावे लागेल एक घर। आणि त्याहूनही घरात राहणार। करावा लागेल आदर्श।।
(ग्रा.अ.१४, ओवी २१,२२)
मित्रहो, आज करोना-१९ संसर्गरोग महामारीने संपूर्ण जग हतबल झालेले आहे.  हे माणसाच्याच चुकीच्या वागणुकीमुळे.
जगातील आज अमेरिका, स्पेन इटली सारखी विकसित राष्ट्र कोरोनामुळे अडचणीत आलेले आहेत. मृत्युदर दररोज वाढतोच आहे. भारतामध्ये वेळीच मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लॉकडाउनची घोषणा केली. प्रशासन व जनतेनेही  ती पाळली. म्हणूनच आपण बरेच सावरलो. यानंतरही आपणास सार्वजनिक जीवनात स्वच्छता, शारीरिक अंतराने वागणे कायमच ठेवावे लागणार आहे. खरंच आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असते तर ग्रामगीते सारखा आरोग्यगीता हा ग्रंथ त्यांनी समाजासाठी लिहिला असता, अनेक प्रासंगिक भजने  लिहिली असती.  या संसर्गजन्य रोगाचे नाव आज जगाला माहीत झाले असले तरी संसर्गजन्य रोग म्हणून त्याचा उल्लेख ग्रामगीतेत त्यांनी केलेला आहे.
 *मद्यमांसाहार करिती कोणी विकार बुद्धी वाटे मनमानी|  भलतेचि रोग जाती लागून| सांसर्गिक आदी|
(ग्रामगीता अध्याय १४,ओवी ९४*)
निसर्गाने आपणास भरपूर अन्नधान्ये, फळे दिलीत परंतु आपण माणसांनी प्राणी जगतासही सोडले नाही. कधीकधी सोशल मीडियावर चीन देशातील व्हिडिओ  व फ़ोटो कीटक, कुत्रे, पक्षी,प्राणी, कृमीना माणसे खातानाचे फोटो पाहिले होते व तेव्हा असे वाटले की कितीही क्रूरता व क्रोर्य!
 करोनाचा विषाणू  वटवाघुळ या पक्षापासून माणसात संक्रमित झालेला आहे  तेव्हा करोनाच्या निमित्ताने जगालाच इशारा या निसर्गाने दिलेला आहे असे म्हणता येईल. वेळीच जागे व्हा! नाहीतर मरणाला तयार व्हा! असाच काहीसा इशारा करोनाने दिलेला आहे.
आपल्या जीवनशैलीमध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे. निसर्गाच्या नियमाची केलेल्या मोडतोडीचा परिणाम कोरोना संकट आहे.
 *प्रातःकालीन उठण्याचे महत्व:-*
उशिरा उठणार माणूस आळशी म्हटला जातो. उशिरा उठल्याने अंगी जडपणा, अवयव शिथिलता येते. मलबद्धता वाढते. त्यामुळे रोगाचे निर्मिती होते त्याचा परिणाम कार्यशैलीवर होऊन घरात दुर्भाग्य शिरते. प्रातःकालची आरोग्यदायी हवा सर्व जीवांना मानवणारी असते. ती व्यक्तीत व सृष्टीत सजीवता निर्माण करते. सकाळी फिरल्याने रक्त शुद्ध होऊन व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्या वेळी उत्तम संकल्प केल्यास पूर्ण होतात. म्हणून नियमितपणे प्रात:स्मरण करावे. निसर्गाच्या वातावरणाने उत्साहाने भरावे. सुदृढ आरोग्यासाठी हाच नित्यनियम महाराजांनी सांगितलेला आहे. *सकाळी करावे उष:पान। त्याचे अंतरीइंद्रियाचे शांतवन। नंतर करावे शीतजलस्नान। अति प्रसन्न चित्त राहे।। (ओवी ४९)*
 सकाळी थंड पाण्याने स्नान करावे. त्यामुळे त्वचेतील शक्ती जागृत होते. तरतरी व उत्साह वाढतो. मेंदूचा भाग थंड राहिला तर बुद्धीचा विकास होतो असा थोरांचा अनुभव आहे.
 स्नानानंतर प्रार्थना मंदिरात निर्मळ स्थळी उपासना ध्यान करावे. महाराजांनी सकाळच्या उत्तम स्थितीचे वर्णन केलेले आहे. प्रातःकाळी कुणी धावताहेत, चालत आहेत, कोणी योगासने- सूर्यनमस्कार करीत आहेत, गाताहेत, चिंतन करत आहेत. अशा सुंदर वेगवेगळ्या दृश्याची कल्पना महाराजांनी केलेली आहे. घराची, आश्रमाची मंदिराची, रस्त्याची, गाई-म्हशीच्या गोठ्याची आरशासारखी स्वच्छता ठेवण्यास ते सांगतात.
 २०१४ पासून भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेले आहे . महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेनेतूच हे अभियान सुरु आहे. त्यामुळे देशातील गावे, शहरे, नद्या, तळी स्वच्छ व्हायला लागल्या. श्रमप्रतिष्ठा व कार्यसंस्कृती निर्माण व्हायला लागली. समाजामध्ये स्वच्छता हे मूल्य रुजायला लागले. आज कोरोना आपत्तीत आपण इतर देशांच्या तुलनेत कमी प्रभावित झालेलो आहेत. त्यासाठी स्वच्छतेबाबत आपली जागृतीच कारणीभूत झालेली आहे. आज असे निदर्शनास येते आहे की, एक महिना लॉकडाऊन, सर्व भारत घरात आहे. तेव्हा निसर्ग स्वच्छ झालेला आहे. पक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करीत आहेत. प्रदूषण कमी झालेले आहे. नर्मदा नदीचे पाणी मिनरल झाले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर कमी झालेला आहे. घरातच असल्यामुळे बाहेरील खाणे फास्टफूड याला आळा बसला आहे. प्रत्येकाची झोप पुरेशी होते, मानसिक त्रास, ताण प्रत्येकाचा कमी झालेला आहे, नवी ऊर्जा प्राप्त झालेली आहे, प्रत्येक जण स्वच्छता पाळत आहे. त्यामुळे दवाखानाही कमी झालेला आहे. घरचेच खाणे त्यामुळे आरोग्य सुधारले आहे. ऑनलाईन व सोशल मीडियावर मुलांचे शिकणेही सुरु आहे. निसर्गाने आपणास दिलेली सजा ही निसर्गाची विश्रांती आहे असे वाटायला लागले आहे. अशा प्रसंगी महाराजांनी ग्रामगीतेत आरोग्याबाबत कसे राहावे वागावे हे सांगितलेले आहे. ते आजच्या काळातही किती अभंग व  प्रासंगिक आहे हे आपल्या लक्षात येते.  स्वच्छता ही सर्वांना आवडते. जिथे स्वच्छता तिथेच आरोग्य नांदू लागते व तेथील लोकांना उदंड आयुष्य लाभते. आहाराच्या पद्धतीबाबत महाराज लिहितात,
 *भोजन म्हणजे आहार घेणे। तेथे कशाला देवाचे गाणे। हास्यविनोद कां न करणे। उल्हासास्तव।।(ओवी ७३)*
आहार घेताना उल्हास यावा म्हणून हास्यविनोद करावे प्रसन्न चित्ताने आहार घ्यावा. अन्नाची आहुती देणे यास थोर लोक यज्ञ म्हणत. शुद्ध मनाच्या घडणीसाठी सुविचार, शुभचिंतन केल्याने अन्नाबरोबर निर्मळ गुणांचा प्रवेश शरीरात होतो. जेवताना आजूबाजूस पवित्र सात्विक रोगनाशक वातावरण निर्माण करून रांगोळ्या काढून भोजनाची जागा प्रसन्न करावी. हात-पाय स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ पुसून घ्यावेत. त्यामुळे अग्नी दिपण होते. भोजनापूर्वी सर्वांनी मिळून काम करावेत. जेवणात बसल्यावर गीतापाठ आणि शांतीमंत्र म्हणावा. सर्वांना समर्पण करून आदराने अन्न सेवन करावे. पात्राजवळ घास घेणे व पाणी फिरवणे म्हणजेच अन्न ईश्वरास अर्पण करणे होय. अन्न ईश्वराने निर्माण केल्यामुळे अन्न हे ईश्वरी प्रसाद होईल. *राजस, तामस, सात्विक। भोजनाचे प्रकार अनेक। त्यात आपली शक्ती पाहूनि सम्यका  पचेल तैसे करावे।। (ओवी ८८)*
 आहार कसा घ्यावा? पचायला हलका आपल्या प्रकृतीशी जुळणारे खाद्य घ्यावे. माणसाने काय खावे म्हणजे तो माणसाप्रमाणे शोभेल हाच सज्जनांनी विचार करावयाचा आहे. महाराज म्हणतात,
 *ज्यासि मनुष्य लाभावे। ऐसे वाटे जीवेभावे। त्याने सात्विक अन्नची सेवावे। सर्वतोपरी।। (ओवी १०३* )
मनुष्यपण प्राप्त होण्यासाठी सर्वतोपरी सात्विक अन्न सेवन करणे याला महाराजांनी महत्त्व दिलेले आहे. सात्विक अन्न सहजतेने सर्वांना प्राप्त होते जे श्रम करून शेतीत पिकविल्या जाते. भाजी, भाकर, भात, पोळी कंद मुळे यामध्ये सत्वांश असते आणि ते आरोग्यवर्धकासाठी आवश्यक असते. तळले, विटले आंबट, खारट, अतिगोड, मसालायुक्त अन्न खाऊ नयेत. महाराज म्हणतात, प्रकृतीच्या विरुद्ध आहार घेणे, खाताना काळवेळाचा विचार न करणे, आंबट तेलकट असे मिश्रआहार हे विषारी आहार आहेत. अशा विषारी आहारामुळे प्रकृती बिघडते. अति जास्त खाण्यामुळे विकृती निर्माण झाली तर त्याला प्रत्यक्ष धन्वंतरीही सुधारू शकत नाही. त्यावर औषधी व संपत्ती खर्च करूनही काही उपयोग होत नाही.
 *नियमित सात्विक अन्नची खावे।साधे, ताजे, भाजीपाले बरवे। दूध,  दही आपल्या परी सेवावे। भोजन करावे औषधचि।। (ओवी १२६)*
 तुकडोजी महाराज म्हणतात, मनुष्याच्या भोजनात नियमितपणा असावा व साधे ताजे उत्तम सात्विक अशा पालेभाज्यांचा समावेश आहारात करावा.
दूध, दही आपल्यापरीने सेवन करावे. भोजन औषध समजून अल्प व मोजके घ्यावे. गाईचे दूध नित्य सेवन केल्यास प्रकृती सुधारते असे ते म्हणतात. त्यालाच ते कायाकल्प म्हणतात. त्यामुळे शक्ती, चपळता कुशाग्र बुद्धी व चांगले आरोग्य लाभते व मनुष्य दीर्घायुषी होतो.
संदर्भग्रंथ - १.राष्ट्रसंत तुकडोजी विरचित ग्रामगीता
२. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारदर्शन- संपादक डॉ. एल. एस. तुळणकर


 *प्रा. प्रल्हाद भोपे*
मो. ९९२२७९४१६४
श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी
(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत.)

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

कोरोनाच्या निमित्ताने

जगापुढे एक मोठे संकट कोरोना व्हायरसने निर्माण केलेले आहे. मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. २२ मार्च २०२० पासून आपण सर्व घरात परिवारासोबत बंद आहोत. 'थांबला तो संपला' ही म्हणच अर्थहीन ठरली.'थांबला तो जगला' हा नवीन अर्थ  त्या म्हणीस प्राप्त झाला.
राष्ट्रसंत तुकडोजींचे भजन आहे,
भविकांच्या मेळयात दिसला हरी
धावुनिया सगळ्याची कामे करी
त्याप्रमाणे हा हरी मंदिरी नाही. मंदिरात आहे दगड,  निर्जीव मूर्ती.
 हे देशातील सर्व मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार, प्रार्थना घरे बंद करावी लागली तेव्हा प्रकर्षाने जाणवले.
हा देव आपणास डॉक्टर्स, नर्स, आरोग्य अधिकारी, शेतकरी,सैनिक, पोलिस, दूधवाले, किराणा दुकानदार, भाजी-फ़ळ विक्रेते, प्रिंट व ईलेक्ट्रॉनिक मीडिया बंधु यांच्यामध्ये दिसला. पुन्हा तो निर्माता निर्गुण निराकार आहे याची प्रचिती आली.
 कवी हा जीवनाचा भाष्यकार असतो हे कवी केशवसुताच्या 'आम्ही कोण' या कवितेत अनुभवलं होतं.
कवी कुसुमाग्रज यांनी यापूर्वीच 'दर्शनाला आलात? या..'
ही कविता लिहिली होती. आज कोविड- १९ संसर्ग आपत्कालीन परिस्थितितील जाणीव त्यांना आधीच झालेली होती. ही कविता  सद्यस्थितिचे नेमके भाष्य करते.
दर्शनाला आलात? या...

पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...