करांच्या बाबतीत पहिल्यांदा वाचताना येऊ शकतो.
मर्ढेकरांच्या बाबतीत अश्लीलतेचा आरोप अनेकांनी केला. तो धुरळा आता बर्यापैकी खाली बसलेला आहे. त्याबाबतीत मी जास्त काही लिहीत नाही. त्यांना बेधडक भाषा वापरून वाचकांना खडबडून जागे करायचे होते असे वाटते. 'हाडांचे सापळे' झालेले पुरूष, आणि 'किरटी हाडबंडले' झालेल्या बायका, ह्यांच्यातल्या अर्थहीन, यंत्रवत् समागम त्यांना भयावह वाटत होता.
'सोडवेना सोडवीतां
गेल्या रात्रींचा हा पाश
जागा आहें तरी आता
मेल्या इच्छा सावकाश.'
अशा ओळींवर त्या काळात लोक भडकले, वादविवाद घडले. अनेक मान्यवरांनी त्यात भाग घेतला. 'लिंग', 'स्तन'सारखे शब्द मर्ढेकरांच्या कवितेत आल्याने खळबळ माजली. मराठी कवितेला हे नवीन परिमाण मर्ढेकरांनी बहाल केले. तिची नवी अभिव्यक्ती मर्ढेकरांनी घडवली. अभिव्यक्तीच्या कल्पनांत भारतात अजूनही इतका गोंधळ जाणवतो, की हे काम त्या काळात मर्ढेकरांनी केले, हा मोठाच क्रांतिकारी बदल आहे.
मर्ढेकरांचा आशयच इतका संपन्न आहे, की त्यांच्या भाषाशैलीकडे बघायला लोकांना ताकद उरत नाही. बोरकरांसारख्या कवीकडे जे भाषेचे लेणे दिसते, ते मर्ढेकरांकडे दिसत नाही, हे मात्र मान्य केले पाहिजे. शब्दांच्या आविष्कारात, शैलीबाजपणात मर्ढेकर थोडे कमी पडतात की काय, असे वाटत राहते. परंतु मर्ढेकरांनी रुपक, उपमा, उत्प्रेक्षा ह्या अलंकारांचा प्रभावी वापर करून ही त्रुटी फार जाणवू दिली नाही. मर्ढेकरांची रुपके आणि प्रतिमा ह्यांना स्वतःचे एक अस्तित्व येते. त्या कळीचे फुलात रूपांतर व्हावे तशा स्वतःहूनच फुलायला लागतात. त्यांच्या प्रतिमा वाचकाशी भावनांचे नाते जोडून समानता दाखवतात. 'गोळ्यांचे पराग' ह्या वर आलेल्या उपहास करणार्या प्रतिमेमधून मर्ढेकर किती चटकन वैफल्य सांगतात! हे सर्वच खुल्या डोळ्यांनी, झापडे न लावता बघायला हवे.
मर्ढेकरांवर असंख्य पुस्तके, लेख लिहिले गेले आहेत. चर्चासत्रे, परिसंवाद ... काही विचारू नका. ह्या लेखात मी कितीसे सांगणार? त्यांच्या सौंदर्यशास्त्रविषयक लिखाणाला मी स्पर्शही करू शकलेलो नाही. माझा तेवढा काही अभ्यासही नाही. त्यांच्या कवितांबद्दल जे वाटलं, ते लिहीलं, एवढंच. दोन-चार आवडलेल्या ओळी वगैरे. मराठी भाषा दिनानिमित्त एका महाकवीबद्दल मराठी भाषेला दिलेला हा छोटासा नजराणा. शेवटी मर्ढेकरांबद्दल ते त्यांच्या देवाला किंवा आदिशक्तीला उद्देशून जे म्हणतात तेच लागू पडते.
'किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंतें;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनीं येतें.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा