मंगळवार, २३ जुलै, २०१९

विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवीलेखकनाटककार कथाकार व समीक्षकहोते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.

जीवनसंपादन करा

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. [१] कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबतस्वराज्यप्रभातनवयुगधनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.[ https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit&section=1]
त्यांच्या टिळकवाडी, नाशिक येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे .

लेखनशैलीसंपादन करा

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटककादंबरीकथालघुनिबंधइत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.

                  कणा

ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!


कणा"

        नववीत असताना कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता अभ्यासक्रमात होती...खरतर ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या जवळची आहे.खूप साध्या शब्दात मांडलेली  ही कविता...स्वाभिमान जपणं शिकवणारी...कठीण परिस्थितीतही जगण्याचे बळ देणारी...शाळेत शिकलेली ही कविता आयुष्यभरासाठी पाठ होऊन गेली कारण तिचा आशय...तिच्यातून  मिळणारी प्रेरणा आणि तिचा साधेपणा !!!
 
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiMp4SZ0KMvSU6Lq9ptvS__AnjAfIJv7ufM5ff1-Km_IZe42Z9pPKX9pcM1Q6LgOFs7eA8vKBAUTX23GStljjrRz8bK2Sr8HNzlI_1ajNB-9XCLEW9k0QKiFQE_vbmYz1wY59XptSGbXI4/s1600/1503.jpg
  
     तर, नव्याने संसार थाटलेल्या घरात गंगा नदीच्या पुराचे पाणी येते आणि  संसार उध्वस्त होतो..होत्याचे नव्हते  व्हायला काही क्षण पुरतात आणि शेवटी डोळ्यांतही आसवांचा पूर ओसंडून वाहू लागतो.अशा या परिस्थितीत त्या मुलाला मायेने आपल्यावर हात फिरवणारे,प्रसंगी धीर देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे शिक्षक आठवतात.
    तो सरांना भेटून  सारी कहाणी सांगतो.ते ऐकून सरांचा आपसूक पैशांची मदत करण्यासाठी  खिशाकडे जाणारा हात पाहताच तो सरांना अडवतो आणि म्हणतो, "मी तुमच्याकडे आर्थिक नाही तर मानसिक मदत मागायला आलोय.एकटेपणा जाणवत होता म्हणून धीराचे दोन शब्द ऐकायला आलोय.माझा संसार जरी मोडून पडला असेल तरी माझा पाठीचा कणा (स्वाभिमान) अजूनही ताठ  आहे.तुमचा आशीर्वाद फक्त द्या पुढची लढाई मी लढू शकतो." असा आशय असलेली ही कविता साऱ्यांनाच आयुष्यात प्रेरणादायी वाटते.
    संवादाच्या रिसेप्शन सिद्धांता नुसार, कवितेचा अर्थ वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार आणि त्याच्या अनुभवानुसार बदलत असतो.परंतु कुसुमाग्रजांची ही कविता मराठी माणसाच्या जवळ असण्याच कारण म्हणजे प्रत्येक मराठी मनाला ही कविता जगण्याच धैर्य देते.एक नवीन आशा निर्माण करते,वाचणाऱ्याच्या  मानसिकतेनुसार तिचा प्रभाव वेगळा ठरू शकतो परंतु आशय हा बदलत नाही.आणि म्हणूनच ती साऱ्यांनाच जवळची वाटते.

साहित्यविचारसंपादन करा

प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.[२][३]
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.
कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.
"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्‍मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसार्‍यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही."
कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. तसेच त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे करता येईल.

कलेचे आधारभूत तत्त्व 
कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.
ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणार्‍या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)
या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...