बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे,
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सुर तुझ्या आवडीचे,

राहू दे स्वातंत्र्य माझे,
फक्त उच्चारांतले गा,
अक्षरां आकार तूझ्या,
फुफ्फुसांचा वाहू दे गा.

लोभ जीभेचा जळू दे,
दे थिजू विद्वेष सारा,
द्रौपदीचे सत्त्व माझ्या
लाभू दे भाषा शरीरा.

जाऊ दे कापर्ण्य 'मी' चे,
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र काट्याची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेऊ दे तीतून माते
शब्द तूझ्या स्पंदनांचे.

धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जे जे पाहणे;
वाकू दे बुद्धीस माझ्या,
तप्त पोलादाप्रमाणे.

आशयाचा तूच स्वामी,
शब्दवाही मी भिकारी,
मागण्याला अंत नाही
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परि म्या,
तूही कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्
तूच घेणारा स्वभावे.

- कवि बाळ सीताराम मर्ढेकर (१९०९-१९५६)

मी पणाचे कवच, अहंकार गळून पडल्याशिवाय निखळ कवितेची निर्मिति होऊ शकणार नाही
असा ह्या कवितेचा आशय आहे. ही कविता वाक्देवतेला उद्देशून आहे.

करांच्या बाबतीत पहिल्यांदा वाचताना येऊ शकतो.

मर्ढेकरांच्या बाबतीत अश्लीलतेचा आरोप अनेकांनी केला. तो धुरळा आता बर्‍यापैकी खाली बसलेला आहे. त्याबाबतीत मी जास्त काही लिहीत नाही. त्यांना बेधडक भाषा वापरून वाचकांना खडबडून जागे करायचे होते असे वाटते. 'हाडांचे सापळे' झालेले पुरूष, आणि 'किरटी हाडबंडले' झालेल्या बायका, ह्यांच्यातल्या अर्थहीन, यंत्रवत् समागम त्यांना भयावह वाटत होता.

'सोडवेना सोडवीतां
गेल्या रात्रींचा हा पाश
जागा आहें तरी आता
मेल्या इच्छा सावकाश.'

अशा ओळींवर त्या काळात लोक भडकले, वादविवाद घडले. अनेक मान्यवरांनी त्यात भाग घेतला. 'लिंग', 'स्तन'सारखे शब्द मर्ढेकरांच्या कवितेत आल्याने खळबळ माजली. मराठी कवितेला हे नवीन परिमाण मर्ढेकरांनी बहाल केले. तिची नवी अभिव्यक्ती मर्ढेकरांनी घडवली. अभिव्यक्तीच्या कल्पनांत भारतात अजूनही इतका गोंधळ जाणवतो, की हे काम त्या काळात मर्ढेकरांनी केले, हा मोठाच क्रांतिकारी बदल आहे.

मर्ढेकरांचा आशयच इतका संपन्न आहे, की त्यांच्या भाषाशैलीकडे बघायला लोकांना ताकद उरत नाही. बोरकरांसारख्या कवीकडे जे भाषेचे लेणे दिसते, ते मर्ढेकरांकडे दिसत नाही, हे मात्र मान्य केले पाहिजे. शब्दांच्या आविष्कारात, शैलीबाजपणात मर्ढेकर थोडे कमी पडतात की काय, असे वाटत राहते. परंतु मर्ढेकरांनी रुपक, उपमा, उत्प्रेक्षा ह्या अलंकारांचा प्रभावी वापर करून ही त्रुटी फार जाणवू दिली नाही. मर्ढेकरांची रुपके आणि प्रतिमा ह्यांना स्वतःचे एक अस्तित्व येते. त्या कळीचे फुलात रूपांतर व्हावे तशा स्वतःहूनच फुलायला लागतात. त्यांच्या प्रतिमा वाचकाशी भावनांचे नाते जोडून समानता दाखवतात. 'गोळ्यांचे पराग' ह्या वर आलेल्या उपहास करणार्‍या प्रतिमेमधून मर्ढेकर किती चटकन वैफल्य सांगतात! हे सर्वच खुल्या डोळ्यांनी, झापडे न लावता बघायला हवे.

मर्ढेकरांवर असंख्य पुस्तके, लेख लिहिले गेले आहेत. चर्चासत्रे, परिसंवाद ... काही विचारू नका. ह्या लेखात मी कितीसे सांगणार? त्यांच्या सौंदर्यशास्त्रविषयक लिखाणाला मी स्पर्शही करू शकलेलो नाही. माझा तेवढा काही अभ्यासही नाही. त्यांच्या कवितांबद्दल जे वाटलं, ते लिहीलं, एवढंच. दोन-चार आवडलेल्या ओळी वगैरे. मराठी भाषा दिनानिमित्त एका महाकवीबद्दल मराठी भाषेला दिलेला हा छोटासा नजराणा. शेवटी मर्ढेकरांबद्दल ते त्यांच्या देवाला किंवा आदिशक्तीला उद्देशून जे म्हणतात तेच लागू पडते.

'किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंतें;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनीं येतें.'

कार्ल मार्क्‍स - नारायण सुर्वे

नारायण गंगाराम सुर्वे (जन्म : १५ ऑक्टोबर १९२६; - १६ ऑगस्ट २०१०[]) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त.
 नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.

१९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीतील एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम मरणाऱ्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. []त्याच गिरणीत बाईंडिंग खात्यात काम करणाऱ्या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वतःच्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्ऱ्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. हे दांपत्य मुळचे कोकणातील हेताचीवाडी(भुईबावडा) येथील होते. त्यांनी नारायणास मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले.नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.

मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले.

"कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. .

गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला संदर्भ हवा ]. इ.स. १९६२ साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.

सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरुवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच्याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असे सुर्वे म्हणत.

त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला.

नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.

ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधतांय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.

काव्य संग्रह 

ऐसा गा मी ब्रह्म

जाहीरनामा

नव्या माणसाचे आगमन

पुन्हा एकदा कविता

माझे विद्यापीठ

सनद

नारायण सुर्वे यांच्या काव्याचा नमुना

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते.
बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते.
जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले;
आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्त्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, .......


"असे आम्ही लक्षावधी नारीनर दिवस असे तो वावरतो,

राबता, खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवुन घेतो."

[[ तेव्हा एक कर ! ]]

जेव्हा मी या अस्तित्त्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर

तू निःशंकपणे डोळे पूस.

ठीकच आहे चार दिवस-

उर धपापेल, जीव गुदमरेल.

उतू जणारे हुंदके आवर,

कढ आवर.

उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस

खुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर

मला स्मरून कर,

हवे अत्र मला विस्मरून कर.

{{ दोन दिवस वाट पाहण्यात गेले}}

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

[[इतका वाईट नाही मी]]

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस

दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले

आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस

हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद

पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको

आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.

नारायण सुर्वेवरील पुस्तके

ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

सुर्व्यांच्या काव्याची इहवादी समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)

नारायण सुर्वे यांना मिळालेले पुरस्कार 

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४)

मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)

सोव्हिएत रशियाचं नेहरू ॲवॉर्ड

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा नरसिंह मेहता पुरस्कार

कराड साहित्य पुरस्कार

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, वगैरे.

कार्ल मार्क्स - कविता

माझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

मिरवणुकीच्या मध्यभागी

माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.

जानकी अक्का म्हणाली, ‘वळिखलंस ह्याला –

ह्यो आमचा मार्कसबाबा

जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले

आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.

‘सन्याषाला काय बाबा

सगळीकडची भूमी सारखीच

तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’

माझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

 नारायण सुर्वे हे परभणी येथे इ.स. १९९५मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

पुढे एका सभेत मी बोलत होतो,

– तर या मंदीचे कारण काय

दारिद्र्याचे गोत्र काय

पुन्हा मार्क्‍स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,

आणि घडाघडा बोलतच गेला.

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.

मी म्हणालो –

‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,

यापुढच्या सर्वच चरित्रांचेही.’

तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली

खळखळून हसत, पुढे येत;

खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,

‘अरे कविता-बिविता लिहितोस की काय

छान, छान.

मलासुद्धा गटे आवडायचा.’

मैत्री २०१२शोधा
शोधा 
मुख्य मेनू
मुखपृष्ठ
About
पोस्टचे नॅव्हिगेशन← PreviousNext →
कार्ल मार्क्स
Posted on एप्रिल 12, 2023
कवितांच्या प्रदेशात : २
 
डॉ. उमेश करंबेळकर 
एकोणिसाव्या शतकातील, ज्याच्या विचारांनी संपूर्ण जगातील औद्योगिक विश्वात क्रांती घडवून आणली आणि साम्यवादी विचारसरणीचा ज्याने पाया घातला, असा महान जर्मन तत्वज्ञ म्हणजे कार्ल मार्क्स ! भारतातील कामगार चळवळीचं, विशेषतः गेल्या शतकातील मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीचं, प्रेरणास्थानही ‘मार्क्स आणि त्याची विचारसरणी’ हेच होतं. साहजिकच ज्यांचं बालपण गिरणगावात एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरात गेलं त्या कविवर्य नारायण सुर्व्यांच्या कानावर मार्क्सचं नाव फार लहानपणीच पडलं आणि साम्यवादी विचारसरणीचं बाळकडूही त्यांना तेव्हाच मिळालं. मार्क्सचा हा प्रभाव सुर्व्यांवर अखेरपर्यंत कायम राहिला.
कार्ल मार्क्स सुर्व्यांच्या शरीरात आणि मनात किती खोलवर भिनला होता याचे उदाहरण म्हणजे त्यांची ‘कार्ल मार्क्स’ ही कविता. ही कविता त्यांच्या ‘जाहीरनामा’ या काव्यसंग्रहातील आहे. खरं तर, कार्ल मार्क्स हा एका महाकाव्याचाच विषय. त्याला तीस-चाळीस ओळींच्या कवितेत बसविणे म्हणजे कठीणच. परंतु असामान्य कवितेचं वैशिष्ट्य असं की अल्प पण समर्पक शब्दांत ती फार मोठा आशय आणि विषय प्रकट करते. कार्ल मार्क्स या कवितेत आपल्याला ह्या गोष्टीची प्रचिती येते.

कार्ल मार्क्स

माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला

मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.
जानकी अक्का म्हणाली ‘वळिखलंस ह्याला-
ह्यो आमचा मार्क्सबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.
संन्याशाला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखीच त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला.

पुढे; एका सभेत मी बोलत होतो,
तर या मंदीचं कारण काय ?
दारिद्याचे गोत्र काय ?
पुन्हा मार्क्स पुढे आला ; मी सांगतो म्हणाला
आणि घडाघडा बोलतच गेला.

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.
मी म्हणालो –
‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,
या पुढच्या सर्वच चरित्रांचेही.’
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत ;
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,
‘अरे, कविता-बिविता लिहितोस की काय ?
छान, छान.
मलासुद्धा गटे आवडायचा.’

नारायण सुर्व्यांच्या जीवनसंघर्षाची सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच सुरू होते. त्यांच्या आईने त्यांन चार-पाच महिन्यांचे असताना एका कापड गिरणीच्या गेटवर टाकून दिलं. १९२६ साली गंगाराम सुर्वे ह्या गिरणी कामगाराला त्याच्या गिरणीच्या गेटपाशी हे अनाथ मूल सापडलं. त्याने त्या मुलाला घरी आणलं आणि त्याचं नाव ठेवलं नारायण.विशेष म्हणजे त्याने आणि त्याच्या बायकोने ह्या मुलाला कधी परकं मानलं नाही आणि पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचं पालन-पोषण केलं. अशा तऱ्हेने माणुसकीचे संस्कार सुर्व्यांवर फार लहानपणीच झाले होते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आधुनिक मराठी कवितेला ज्यांच्या कवितांनी वेगळे वळण दिलं त्या कविवर्य नारायण सुर्व्यांची ही आगळीवेगळी जन्म कहाणी.

सुर्व्यांनी गिरणी कामगाराचं हलाखीचं जीवन फार जवळून पाहिलं. काही काळ त्यांनी गिरणीत नोकरीही केली. नंतर त्यांनी शाळेत शिपाई म्हणून व नंतर तेथेच शिक्षक म्हणून काम केलं. १९५६ च्या सुमारास त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. सुर्व्यांचं ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ,’ ‘जाहीरनामा’ आणि ‘नव्या माणसाचे आगमन’ असे चार काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.सुर्व्यांची कविता कामगार, वेश्या, दादर पुलाखालची माणसे, पोस्टर चिकटवणारी माणसे अशा मुंबापुरीतील उपेक्षितांच्या वेदना सजीव करणारी आहे. ह्या सर्वांच्या जीवनाशी त्यांचा निकटचा संबंध आल्यामुळे त्यांच्या कवितेतील वास्तव काळजाला भिडणारं ठरतं. सुर्व्यांना माणसांच्या गर्दीत वावरायला आवडायचं. त्यामुळे त्यांच्या कवितेचा विषयही प्रामुख्याने माणूसच राहिला.

त्यांच्या बऱ्याचशा कविता निवेदन शैलीतील आहेत. याचं कारण त्यांना कवितेच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधायचा असे. कागदावरील कवितेपेक्षा सादरीकरणातून प्रकट झालेली कविता अधिक परिणामकारक ठरते. सुर्वे आपली कविताही तितक्याच ताकदीने सादर करत. त्यामुळे त्यांच्या कवितावाचनास रसिकांची गर्दी होई.

‘संथ निवेदनात्मक, संवादांचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक साधणारी आणि गद्याच्या अंगाने जाणारी’ असं सुर्व्यांच्या काव्यशैलीचं थोडक्यात वर्णन करता येईल.
सुर्व्यांच्या कवितेची ही सर्व वैशिष्ट्यं त्यांच्या कार्ल मार्क्स या कवितेत आपल्याला पाहायला मिळतात.
कवितेच्या सुरुवातीस मार्क्स आपल्याला पहिल्या संपात भेटला असं सांगून सुर्वे तो कसा भेटला याचा किस्सा सांगतात. कुठल्याही संपाची सुरूवात मिरवणुकीने किंवा मोर्चाने होते. मिरवणूकीत कोण आणि किती सामील झाले यावरून कामगारांना जशी आपल्या शक्तीची जाणीव होऊन उमेद मिळते, आधार मिळतो त्याप्रमाणे मालकवर्गालाही कामगारांची ताकद कळते आणि कामगारांच्या असंतोषाची जाणीव होते.

अशाच एका मिरवणुकीत सुर्व्यांच्या खांद्यावर मार्क्सचं छायाचित्र असलेला बॅनर होता. त्याकडे बोट दाखवून अशिक्षित जानकी अक्का आपल्या ग्रामीण भाषेत सुर्व्यांना मार्क्सची ओळख करून देते. मार्क्सचा ती ‘आमचा मार्क्सबाबा’ असा एकेरी उल्लेख करते. मार्क्सचा जन्म जर्मनीत झाला पण त्याचा शेवट इंग्लंडमध्ये झाला. त्याचं सर्वात मोठं कार्य म्हणजे त्याची ढीगभर ग्रंथसंपदा. खरं म्हणजे जानकीअक्कासारख्या एका अशिक्षित कामगार बाईनं सुर्व्यांना मार्क्सची ओळख करून द्यावी हीच एक अपूर्व घटना मानली पाहिजे. यातून सुर्वे मार्क्स कामगारवर्गात किती आणि कसा रुजला होता हे अप्रत्यक्षरित्या आपल्या ध्यानात आणून देतात. पोताभर ग्रंथ यातून मार्क्सचा विचार केवढा व्यापक आहे हे ते दाखवतात. त्याचबरोबर आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी शिकणं किती महत्वाचं आहे याची जाणीव जानकीअक्काला झाल्याचंही यातून दिसून येतं.
‘सन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच’ या वाक्यातून मार्क्स केवळ जर्मन अथवा इंग्लंडपुरता मर्यादित नव्हता तर तो जगातील सर्व देशातील कामगारांचा, कष्टकरी वर्गाचा निरिच्छ नेता होता हे जानकीअक्का सांगते.

परंतु ह्या सर्वांपेक्षा ‘तुझ्यासारखीच त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’ या वाक्यातून कार्ल मार्क्सची एखादा धीरगंभीर चेहऱ्याचा, हस्तिदंती मनोऱ्यात राहून प्रबोधन करणारा तत्वज्ञ अशी प्रतिमा डोळ्यासमोर न येता एखाद्या सर्वसामान्य कुटुंबवत्सल गृहस्थाचा प्रेमळ चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि मार्क्सची ही प्रतिमा आपल्याला अधिक भावते.
त्यानंतर सुर्वे आपल्याला एका सभेतील अनुभव सांगतात. एका कामगार सभेत बोलत असताना सुर्वे आर्थिक मंदी आणि त्यातून निर्माण होणारी गरिबी यांचा संबंध कामगारांना सोप्या भाषेत समजावून देत असतात. तेव्हा त्यांच्या तोंडातून मार्क्सचे विचार बाहेर पडू लागतात. हा अनुभव कवितेत शब्दबद्ध करताना सुर्वे म्हणतात, ‘पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला, आणि घडाघडा बोलतच गेला.’ त्यावेळी सुर्व्यांच्या आचार विचार आणि उच्चारातून मार्क्सच प्रकट होत होता. इतका तो त्यांच्या शरीरात भिनला होता.

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच गोष्ट दिसू लागते. विठ्ठलाचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांना ‘विठ्ठल गिती, विठ्ठल चित्ती’ असे झाले आणि ते अवघे विठ्ठलमय होऊन गेले.

मार्क्सचा ध्यास घेतलेल्या सुर्व्यांना असाच अनुभव एका गेट सभेत बोलताना आला. सुर्व्यांना चक्क मार्क्स त्यांचं भाषण ऐकताना दिसला.त्या सभेत बोलण्याच्या ओघात,’ आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढच्या सर्वच चरित्रांचेही’ या वाक्यातून सुर्व्यांमधला कवी डोकावला आणि त्या वाक्याला मार्क्सने कडाडून टाळी वाजवली. पुढे येऊन सुर्व्यांच्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला, ‘अरे कविता बिविता लिहितोस की काय ? छान छान, मलासुद्धा गटे आवडायचा.’

इथे कविता संपते. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ यातून मार्क्स रूक्ष,कोरडा विचारवंत नव्हता. त्याला साहित्याची आवड होती, तो काव्यप्रेमी रसिक होता हे जाणवतं आणि त्याच्याबद्दलचा आपल्या मनातील आदरभाव दुणावतो हे खरे. पण तेवढाच मर्यादित अर्थ त्यातून ध्वनित होत नाही.

खरं म्हणजे सुर्व्यांच्या कवितांचा शेवट फार परिणामकारक असतो. उदाहरणार्थ, ‘शीगवाला’ या कवितेत शेवटी दाऊदचाचा आजच्या जीवनाचं कठोर वास्तव सांगताना, ‘सब्दाला, जागवेल असा कोन हाय दिलवाला, सबको पैसेने खा डाला.’ असं म्हणतो तेव्हा त्यातील दाहक वास्तवता आपल्या काळजाला भिडते. किंवा ‘का गा ग्रंथगर्व’ या कवितेत भाकरी महात्म्य सांगताना शेवटी सुर्वे ‘संपलाच नाही भाकरीचा मार्ग, ग्रंथातले स्वर्ग कशापायी ?’ असा रोखठोक सवाल करतात तेव्हाही आपण असेच सुन्न होतो.

कार्ल मार्क्स या कवितेच्या शेवटी सुर्वे आपल्याला असाच एक वेगळा धक्का देतात. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ या मार्क्सच्या वाक्यातून गटेचे पर्यायाने कवीचे सामाजिक, राजकीय तसेच वैचारिक क्रांतीमधील महत्व अधोरेखित होते.सर्व क्षेत्रातील क्रांतिकारकांना आणि त्यांच्या क्रांतीला काव्याचे अधिष्ठान असतं. किंबहुना क्रांतीची ज्योत ऊर्जस्वल कवनाने पेटविली जाते असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

फ्रान्सच्या राज्यक्रांतीला ‘रूझे द लील’ या तरुण अधिकाऱ्याने लिहिलेल्या ‘ला मार्सेएझ’ या गीताने चैतन्य दिलं. या गीताचा खेड्यापाड्यांतून, वस्तीवस्तीतून प्रसार झाला आणि संपूर्ण फ्रेंच सैन्य या गीताच्या ध्वनीने स्वातंत्र्यसिद्ध झालं. हेच गीत पुढे फ्रान्सचं राष्ट्रगीत म्हणून मान्यता पावलं. कवी आणि कवितेचं महत्त्व लक्षात येण्यासाठी हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे.

गटे हा जर्मनीचा महान कवी समजला जातो आणि मार्क्सवर गटेचा प्रभाव होता. असाच प्रभाव सुर्व्यांच्या काव्यवाचनामुळे मुंबईतल्या कामगार वर्गावर पडत असे. म्हणूनच ‘सुर्व्यांची कविता लढाऊ वृत्तीची व सामाजिक क्रांतीची उपासना करणारी आहे’ असे गौरवोद्गार , ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ हे अजरामर काव्य रचणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांनी काढले.

सुर्वे स्वतःला ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुतांच्या कविपरंपरेचा पाईक समजत. ‘ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत नसते तर आपण कोणीच नसतो’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मलासुद्धा गटे आवडायचा’ यातून मार्क्सपेक्षाही कवी गटे अधिक श्रेष्ठ हेच त्यांना सुचवायचं आहे. कवितेच्या एका ओळीतदेखील प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्याचं सामर्थ्य असतं, हे सुर्वे जाणून होते. त्या दृष्टीने कवी असामान्य, असाधारण असतो. म्हणूनच ‘मार्क्स आणि मार्क्सवाद श्रेष्ठ आहेच पण पोथिनिष्ठ मार्क्सवाद्यांकडून माणूस आणि कलेच्या स्वातंत्र्यावर बंधने आली तर … तर माणसाचा आणि कलेतील सच्चा स्वातंत्र्याचा पक्ष तोच माझाही राहील’ असं सुर्व्यांनी ‘कविता आणि मी’ या लेखात ठामपणे सांगितलं आहे.

‘मलासुद्धा गटे आवडायचा’ या वाक्यातून मार्क्सवादाची मर्यादा आणि विचार स्वातंत्र्य जपणाऱ्या व त्याचा आग्रह धरणाऱ्या कवीचं श्रेष्ठत्व एकाच वेळी सुर्वे आपल्या नजरेस आणतात. त्यामुळे कवितेला एक वेगळेच परिमाण प्राप्त होऊन ही कविता सुर्व्यांच्या सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये स्थान प्राप्त करते.

– संग्रहित साभार ©️ डॉ. उमेश करंबेळकर, सातारा.


भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...